माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचाच म्हाळुंगी पुलासाठी पाठपुरावा! सत्ताधाऱ्यांनी पुलाचे काम राजकारणासाठी रखडवले : दिवटे
नायक वृत्तसेवा, संगमनेर
म्हाळुंगी नदीला आलेल्या पुरामुळे २०२२ मध्ये साईनगरकडे जाणारा पूल खचला होता. हा पूल तातडीने व्हावा याकरता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून साडेचार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला. मात्र राज्यात सत्तांतर झाले आणि फक्त राजकारणासाठी या पूलाचे काम सत्ताधाऱ्यांनी रखडवले. आता पूल झाल्याचे समाधान असून या पुलाचे सर्व श्रेय माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचेच असल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी म्हटले आहे.

दिवटे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, २०२२ मध्ये म्हाळुंगी नदीला आलेल्या पुरामुळे हा पूल पडला होता.यानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात व तत्कालीन नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी पुलाची पाहणी करून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून नागरिकांच्या सोयीसाठी तात्पुरता पूल उभा केला होता. साईनगर, घोडेकर मळा व गंगामाई घाटाकडे जाणारा पूल भक्कम व्हावा याकरता बाळासाहेब थोरात यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता.

मात्र पालकमंत्री व त्यांचे स्थानिक कार्यकर्ते यांनी राजकारण करण्याकरता नगरपालिकेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सचा निधीही या पुलाकरता वळवला आणि अनेक दिवस काम रखडवले. हा पुल तातडीने करावा याकरता नागरिकांची सातत्याने मागणी होती. याचबरोबर म्हाळुंगी नदी पूल कृती समितीने ही आंदोलन केले. तरीही राजकारणाच्या सोयीसाठी हे काम थांबवले होते.

जनतेच्या विकासासाठी राजकारण करायचे असते हा मंत्र बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने जपला आहे. माजी मंत्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर हे शहर हायटेक व वैभवशाली असून संगमनेर मध्ये अत्यंत चांगल्या सुविधा नागरिकांना पुरवल्या जात आहेत.याचबरोबर निळवंडे धरणातून थेट पाईप लाईन योजना आणल्याने भर उन्हाळ्यात सुद्धा संगमनेरकरांना मुबलक पाणी मिळत होते.

संगमनेर हायटेक बस स्थानक,नगरपालिका, न्यायालय इमारत, प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, शासकीय विश्रामगृह, कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह, याचबरोबर प्रवरा नदीवर चार पूल आणि बायपास अशा मोठ्या विकासाच्या योजना राबवल्या आहेत. संगमनेर शहर स्वच्छ व सुंदर शहर असून नगरपालिकेला याबाबत राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले. हिरवाईचे सुरक्षित शहर म्हणून संगमनेरची राज्यात ओळख निर्माण झाली आहे.
या परिसरातील स्थानिक नागरिकांनी या पुलाच्या कामासाठी पाठपुरावा केल्याबद्दल माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे व आमदार सत्यजित तांबे यांचे अभिनंदन केले आहे.

साईनगर परिसरातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना सोयी करता म्हाळुंगी पूल लवकरात लवकर व्हावा याकरता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला होता. पूल सुरू झाल्याचा आनंद असून या पूल उभारणीचे श्रेय हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचेच असल्याचे सोमेश्वर दिवटे यांनी म्हटले आहे.

Visits: 111 Today: 1 Total: 1418032
