जनाधार असलेल्या नेत्यांची काँग्रेसच्या वरीष्ठांना ‘अ‍ॅलर्जी’! आमदार सत्यजीत तांबेंचा निशाणा; भविष्यातील भाजप प्रवेशाचेही संकेत..

 
नायक वृत्तसेवा, संगमनेर
‘सिटीझनविल’ या अनुवादीत पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘डोळ्यात भरलेल्या’ सत्यजीत तांबे यांची त्यानंतरच्या काळातील राजकीय कारकीर्द सतत ‘संशयीत’ राहीली आहे. त्यातूनच पदवीधर मतदारसंघात पक्षाचा ‘एबी’ फॉर्म हातात असतानाही त्यांनी भाजपच्या पाठबळावर अपक्ष उमेदवारी करीत विजय मिळवला. तेव्हापासून पक्षातून निलंबित असलेले मात्र स्थानिक काँग्रेसच्या प्रत्येक कार्यक्रमात हजर राहणारे आमदार तांबे आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशावरुन निशाणा साधीत काँग्रेसच्या वरीष्ठांना जनाधार असलेल्या नेत्यांची ‘अ‍ॅलर्जी’ असल्याची घणाघातील टीका करीत थेट पक्षाच्या नेतृत्वावरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांना दूरदृष्टी असल्याने पुढील राजकीय वाटचाल त्यांच्याच मार्गदर्शनाखाली करण्याची जाहीर इच्छाही प्रकट करुन त्यांनी भविष्यात भाजप प्रवेशाचे संकेतही दिले आहेत. आमदार सत्यजीत तांबे यांच्या या वक्तव्याने त्यांच्याबाबतचे राजकीय ‘गुढ’ आणखी वाढले असून विविध राजकीय चर्चांनाही उधाण आले आहे.


पुणे जिल्ह्यातील भोरचे माजी काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावरुन राज्यातील काँग्रेसला घरघर लागली आहे का असा प्रश्‍न आमदार सत्यजीत तांबे यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना त्यांनी सध्या राजकीय संक्रमणाचा काळ सुरु असल्याचे सांगताना एखादी राजकीय भूमिका घेवून काँग्रेसमध्ये निर्णय प्रक्रिया राबवली जात नसल्याने नेत्यांसह कार्यकर्त्यांचाही भ्रमनिराश झाल्याकडे लक्ष वेधले. एका बाजूला सातत्याने वाढत असलेली सत्ता आणि कार्यकर्त्यांना बळ देण्याची पद्धत आणि दुसर्‍या बाजूला देशपातळीपासून ग्रामपातळीपर्यंत काँग्रेसमधील संघटनात्मक कमतरता यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नैराश्याची भावना निर्माण झाल्याचे ते म्हणाले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले, त्यापूर्वी काँग्रेसचे दोन-चार आमदार निवडून येतील की नाही अशी अवस्था असताना 42 आमदार निवडून आले.


त्यावेळी आघाडी सरकारच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना ‘नवसंजीवनी’ मिळेल असे वाटतं होते. विविध महामंडळावरील नियुक्त्यांच्या माध्यमातून त्यांना बळ दिले जाईल. त्यातून व्हेंटीलेटरवर गेलेला पेशंट जसा ठणठणीत होवून बाहेर यावा त्याप्रमाणे पक्षालाही सत्तेचे औषध मिळेल अशी कार्यकर्त्यांची भावना होती. मात्र त्यानंतरचा काळ बघितला तर काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांनी राज्यातील मोठा जनाधार असलेल्या नेत्यांकडेच दुर्लक्ष केले. त्यामुळे आजची स्थिती निर्माण झाली आणि ती आता अधिक गंभीर होत असल्याचे थोपटे यांच्या सोडचिठ्ठीतून स्पष्टपणे दिसत असल्याचे आमदार तांबे यांनी सांगितले. याबाबत आपण पक्षाला वेळोवेळी विनंती केल्याचा दाखलाही त्यांनी जोडला.


संग्राम थोपटे यांचा पराभव झाल्यानंतर काँग्रेसमधील कोणत्याही नेत्याने त्यांना फोन करुन विचारणा केली नाही या विषयावर भाष्य करताना त्यांनी काँग्रेसची हिच खरी शोकांतिका असल्याची टीका केली. पदवीधरच्या निवडणुकीत आपणही पक्षाला पाठींबा देण्याच्या विनवण्या केल्या होत्या, पण आपल्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. त्यावरुन जनाधार असलेल्या नेत्यांची काँग्रेसमधील वरीष्ठांना ‘अ‍ॅलर्जी’ असून कोणताही जनाधार नसलेले नेते आज पक्षाचे नेतृत्त्व करीत असल्याचा घणाघाती टोलाही त्यांनी लगावला. पक्षाने याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर पक्ष पतनाची स्थिती यापुढेही कायम राहणार असल्याचे भाकीतही त्यांनी यावेळी वर्तवले.


आपली वाटचाल भाजपच्या दिशेने सुरु आहे का? या आशयाच्या प्रश्‍नाचे उत्तर देताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या नेतृत्वाची भरभरुन प्रशंसा केली. आज आपण त्यांच्याच नेतृत्वाखाली काम करीत असून त्यांचे नेतृत्व आपल्यावर प्रभाव टाकणारे असल्याचे सांगताना त्यांनी त्यांच्यावरील राजकीय संशय आणखी वाढवला. मुख्यमंत्री फडणवीस दूरदृष्टीचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना वेगळाच ‘आनंद’ आणि ‘मजा’ येते. त्यांच्याकडून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळायला असून मुख्यमंत्री सांगतील त्याप्रमाणे आपण पुढील राजकीय वाटचाल करण्याचे निश्‍चित केल्याचे सांगताना एकप्रकारे त्यांनी भाजप प्रवेशाचेही संकेत दिले आहेत. त्यांच्या या वक्तव्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्त्व त्यांनी उघडपणे मान्य केल्याचे स्पष्ट झाल्याने संगमनेर तालुक्यातील राजकीय चर्चांना उधाण आले असून फडणवीसांच्या नेतृत्वाला मान्यता म्हणजे थोरातांपासून दुरावा का? अशाही चर्चा रंगू लागल्या आहेत.


सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या मूशीतून घडलेल्या सत्यजीत तांबे यांनी युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षापासून प्रदेशाध्यक्षापर्यंत संघटनात्मक पातळीवर अडीच दशके काम केले आहे. त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळीत इंधन दरवाढीवरुन झालेल्या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पेट्रोल पंपावरील फलकावर शाई फेकण्याचा प्रकारही घडला होता. आता त्यांनी त्याच पक्षाशी जवळीक वाढवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आणि पुढील राजकीय वाटचालीची उघड इच्छा व्यक्त केल्याने त्यांनी काँग्रेससह माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाला तिलांजली वाहील्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

Visits: 63 Today: 1 Total: 510165

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *