रुग्णसंख्या घटली मात्र, कोविडची दुसरी लाट येण्याची शक्यता –  मुश्रीफ! कोविड केअर सेंटरचा वापर आता पोस्ट कोविड केअर सेंटर म्हणून होणार..

नायक वृत्तसेवा अहमदनगर

गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील कोविडचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ९५ टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. ही अत्यंत दिलासादायक बाब आहे, मात्र असे असले तरी कोविडवरील लस अजून बाजारात  उपलब्ध झालेली नाही याचे प्रत्येकाला स्मरण ठेवावे लागेल. एकीकडे आपण मिशन बिगीन अगेन अंतर्गत विविध गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. मात्र, त्यामुळे निष्काळजीपणा वाढणार नाही आणि प्रादुर्भाव वाढणार नाही, याची प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर आवश्यकच असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज अहमदनगर येथे केले.

यावेळी  पुढे बोलताना मुश्रीफ  म्हणाले की, रुग्णसंख्या घटल्याने कोविड केअर सेंटरचा उपयोग आता पोस्ट कोविड केअर सेंटर म्हणून केला जाईल. कोविड झाल्यानंतर रुग्णांना काही त्रास जाणवत असेल तर त्यांना या सेंटरमध्ये उपचार दिले जातील. पुढील काळात कोविडची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवतांंना त्यांनी जगभरातील तज्ञांनी याबाबत केलेल्या वक्तव्यांचे दाखले दिले. त्यामुळे यापुढील काळात जिल्हावासियांनी अधिक सतर्क राहून आपली व आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

कोविडवर लवकरच लस येईल, अशी आशा व्यक्त करताना त्यांनी अधिकाऱ्यांना लसीकरण मोहिम कशापद्धतीने राबवावी, यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचा डाटाबेस तयार करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा प्रशासनाने त्यादृष्टीने तयारीही सुरु केल्याची माहिती पालकमंत्री मुश्रीफ यांनी यावेळी दिली. 

आज पालकमंत्री मुश्रीफ यांनी पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील करंजी, निपाणी जळगाव, फुंदे टाकळी, येळी, मुंगुसवाडे, आंतरवली, गोळेगाव, बोधेगाव, चापडगाव, करंजी या गावात नुकसानीची पाहणी केली. तेथील शेतकरी वर्गाशी थेट शेतात जाऊन संवाद साधला आणि माहिती घेतली. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप यांच्यासह उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण, तसेच दोन्ही तालुक्यांचे तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे अतिवृष्टी आणि कोरोना परिस्थितीसंदर्भात आढावा बैठक घेतली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, महापौर बाबासाहेब वाकळे, आमदार लहू कानडे, आमदार आशुतोष काळे, महानगरपालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आदी यावेळी उपस्थित होते. त्यानंतर मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Visits: 191 Today: 2 Total: 1415097

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *