समतेचा विचार टिकवण्यासाठी लढा सुरू ः पवार आश्वी येथे अभीष्टचिंतन सोहळ्यासह शेतकरी मेळावा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात पाण्यापासून वीज निर्मितीची नवी दृष्टी दिली. त्यांनी उपेक्षित वर्गात आत्मविश्वास निर्माण केला असून त्यांनी दिलेला राज्यघटनेचा व समतेचा विचार टिकवण्यासाठी लढा सुरू असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे रिपब्लिकन नेते बाळासाहेब गायकवाड यांचा अभीष्टचिंतन सोहळा व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात होते. तर व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार सत्यजीत तांबे, माजी आमदार प्रकाश गजभिये, ज्येष्ठ नेते रावसाहेब म्हस्के, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, अरुण कडू, दुर्गा तांबे, रणजीतसिंह देशमुख, बाजीराव खेमनर, अॅड. माधव कानवडे, बाबासाहेब ओहोळ, उत्कर्षा रुपवते, गणपत सांगळे, सुधीर म्हस्के, अशोक गायकवाड, वैशाली गायकवाड, सरपंच नामदेव शिंदे, विजय हिंगे आदिंसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार शरद पवार म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीश राजवटीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाणी व वीज हे खाते होते. त्यातून त्यांनी धरणांची निर्मिती करण्यासह पाण्यापासून वीजनिर्मिती करून भारताला एक नवी दृष्टी दिली. याचबरोबर कार्यकर्त्यांचा मोठा संच निर्माण करताना उपेक्षित वर्गामध्ये आत्मविश्वास निर्माण केला. हाच वारसा घेऊन बाळासाहेब गायकवाड यांनी काम केले असून अत्यंत खडतर परिस्थितीतून त्यांनी जनमाणसांची कामे केली आहेत. सातत्याने लोकांमध्ये राहण्याबरोबर कधीही कायद्याचा गैरवापर केला नाही. संविधानाने समता दिली असून सध्या भारतीय राज्यघटना व संविधान धोक्यात असल्याने सर्वांनी एकजुटीने समतेचा हा विचार टिकवण्यासाठी सुरू झालेल्या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्र पवार यांनी कायम कार्यकर्त्यांना बळ दिले आहे. राज्यभरातील हाडाचे कार्यकर्ते शोधून त्यांना संधी दिली आहे. सर्वसामान्यांचा सन्मान करणे हे त्यांचे वैशिष्ट्य असून कृषीमंत्री पदाच्या काळात सहा वर्ष पवार साहेबांबरोबर काम करताना राज्याचे विक्रमी कृषी उत्पन्न केले. राज्यातील प्रत्येक विभागाची खडानखडा माहिती असलेले नेतृत्व पवार असून त्यांनी आज आश्वीतील सर्वसामान्य कार्यकर्त्याचा गौरव केला आहे, असे गौरवोद्गार आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले. प्रास्ताविक विजय हिंगे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर राहुल जर्हाड यांनी आभार मानले. यावेळी आश्वी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पवारांनी ज्यांना मोठे केले ते पळाले ः गायकवाड
खासदार शरदचंद्र पवार यांनी अनेकांना मोठमोठे पदे दिली, मात्र ते पळून गेले. परंतु पवार साहेब भक्कमपणे उभे आहेत. ८३ वर्षांचा योद्धा लढतो आहे आणि तुम्ही ईडीला घाबरून घाबरून पळत आहात अशी टीका करताना आपण कायम पुरोगामी विचार जपला असून यापुढील काळात खासदार शरदचंद्र पवार व आमदार बाळासाहेब थोरात यांच्यात नेतृत्वाखाली काम करणार असल्याचा निर्धार सत्कारमूर्ती बाळासाहेब गायकवाड यांनी करुन जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी पूर्ण समाजाची ताकद एकत्र करू असा विश्वास दिला. याचबरोबर देहदान करणार असल्याची घोषणा करत ते पत्र खासदार पवार यांच्या हस्ते माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्याकडे सुपूर्द केले.
