उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिल्यानेच आपल्याला टार्गेट करताहेत! आमदार शंकरराव गडाख; निधी वाटपातही अन्याय केल्याचा केला आरोप
नायक वृत्तसेवा, नेवासा
महाराष्ट्राच्या राजकारणात ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांची अनोखी छाप होती. आता आमदार शंकरराव गडाख यांची देखील कार्यकर्त्यांशी नाळ जुळलेली आहे. ते आमदार झाल्यानंतर महाविकास आघाडीत गेले. उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांची जवळीक आली. त्यांना मंत्रिपद दिलं. पण महायुती सरकार आलं व गडाखांचं मंत्रिपद गेलं. परंतु यानंतर त्यांच्यावर काही प्रमाणात राजकीय कुरघोड्या करण्याचा प्रयत्न सुरु झाला अशी चर्चा नागरिक करत आहेत. आता यावर स्वतः आमदार शंकरराव गडाख यांनी भाष्य केलं असून, उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिल्यानेच आपल्याला टार्गेट केलं जात असल्याचे गडाख यांनी म्हटलं आहे.
भाजप-महायुती सरकारकडून आपल्याला टार्गेट केलं जात आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिल्यानेच जाणीवपूर्वक निधी वाटपात टाळले गेले आहे. राज्य सरकारकडून निधी वाटपात अन्याय केला गेला असून नेवासा तालुक्याला निधी देण्यास टाळले गेले असल्याचा आरोप आमदार शंकरराव गडाख यांनी केला आहे.
नेवासा तालुक्यातील पाचेगाव आणि परिसराला वरदान ठरणार्या बंधार्यातील पाण्याचे जलपूजन आमदार गडाख आणि माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले. यावेळी आमदार गडाख यांनी वरील वक्तव्य केले. यावेळी त्यांनी समन्यायी पाणी वाटप कायद्यावर पुन्हा भाष्य केले. गडाख म्हणाले, पाचेगाव आणि पुनतगाव परिसरातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी रस्त्यावर उतरून मोठा संघर्ष करण्याची तयारी असून अहमदनगर जिल्ह्याला समन्यायी पाणी वाटप कायदा हे ग्रहण आहे. आपल्यावर अन्याय करणारा हा कायदा असल्याने यात बदल व्हावा यासाठी आपण सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे आवाहन केले.