विद्यार्थिनींनी निर्भय आणि आत्मनिर्भर होणे गरजेचे ः डॉ. थोरात सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयात निर्भया कन्या अभियान


नायक वृत्तसेवा, संगमनेर
महिलांचं सामाजिक वास्तव आजही काळजी करण्यासारखं असून त्याला तोंड देण्यासाठी विद्यार्थिनींनी स्वतः आत्मनिर्भर होणे गरजेचे असल्याचे मत एकविरा फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी व्यक्त केले.

सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालय, विद्यार्थी विकास मंडळ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या निर्भया कन्या अभियान कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ, नॅक समन्वयक प्रा. लक्ष्मण घायवट, प्रा. नवनाथ नागरे, निर्भया कन्या अभियानच्या समन्वयक प्रा. रोहिणी जाधव, प्रा. मोहिनी काशिद, डॉ. स्वाती ठुबे, प्रा. कोमल म्हस्के, प्रा. वैशाली शिंदे, प्रा. सीमा मोरे, प्रा. देशमुख, प्रा. जोंधळे, प्रा. अनुजा आभाळे, प्रा. गीता नवले, प्रा. पुंडे, प्रा. आरती घुले, मीना गोसावी आदी प्राध्यापिका उपस्थित होत्या.

पुढे बोलताना डॉ. थोरात म्हणाल्या, बदलत्या परिस्थितीत मुलींनी स्वावलंबी बनणे आवश्यक आहे. त्यसाठी बचत गट, कौशल्य प्राप्ती यांसारख्या मार्गाचा अवलंब करावा. सध्याचा काळ मुलींच्या प्रगतीसाठी महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. सावित्रीबाई फुले यांच्यापासून अलौकीक आदर्श घेवून आपल्या जीवनात निर्भय बनून क्रांतीकारक बदल घडविण्याचे आवाहन त्यांनी केले. संगमनेरच्या माता, भगिनी दूध, भाजीपाला विकून पुणे, मुंबईच्या आरोग्याची काळजी घेतात. पण आपला हिमोग्लोबिन वाढवत नाहीत. तेव्हा आहारात पालेभाज्यांचा वापर करा. स्वागत व प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. जयराम डेरे यांनी केले, पाहुण्यांचा परिचय प्रा. रोहिणी जाधव यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. सविता तांबे यांनी केले तर आभार प्रा. लक्ष्मण घायवट यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापिका व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Visits: 191 Today: 1 Total: 1872910

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *