टाकळीभान उपबाजार आवारात चिखलाचे साम्राज्य व्यापार्यांनी आडत बाजार बंद ठेवण्याचा दिला इशारा

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला मोठा महसूल देणार्या टाकळीभान उपबाजाराच्या आवारात चिखल व खड्ड्यांंचे साम्राज्य वाढले आहे. व्यापार्यांनी खरेदी केलेल्या मालाची उचल करण्यासाठी वाहने धजावत नसल्याने माल पडून आहे. बाजार समिती व्यवस्थापनाच्या दुर्लक्षपणामुळे व्यापार्यांनी आडत बाजार बंद ठेवण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

या संदर्भात व्यापार्यांच्यावतीने बाजार समिती सचिवांना देण्यात आले आहे. सदर निवेदनात म्हटले आहे, उपपबाजार आवारात सध्या मोठमोठे खड्डे पडले आहेत. सततच्या पावसाने त्यामध्ये पाणी साचून चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. खड्डे मोठ्या प्रमाणात असल्याने खरेदी केलेला माल उचलण्यासाठी वाहने धजावत नसल्याने माल गोडाऊनमध्ये पडून आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापार्यांच्या या मागणीकडे वारंवार दुर्लक्ष करीत आहे. उपबाजार आवारात मुरुम किंवा कार्दळ टाकून खड्डे तात्पुरत्या स्वरुपात बुजवावेत. व्यापार्यांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने मंगळवार व शुक्रवार या दोन दिवशी कांदा बाजार बंद ठेवण्यात येईल, असा इशाराही व्यापार्यांनी निवेदनातून दिला आहे.

या निवेदनावर सुभाष ब्राम्हणे, बापूसाहेब नवले, सीताराम जगताप, विजय बिरदवडे, पंकज पटारे, एकनाथ पटारे, रोहित मिरीकर, ललित कोठारी, नितीन दहे, रवींद्र राशिनकर, गणेश चितळकर, अप्पासाहेब हिवाळे, नानासाहेब पवार, किरण खंडागळे, पवन मिरीकर, दादाराम आघम, शिवाजी धुमाळ आदिंची नावे आहेत.
