अकराशे किलोमीटरचा पायी प्रवास करुन केली तीर्थयात्रा कोपरगाव तालुक्यातील टायगर ग्रुपच्या तरुणांचा उपक्रम

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
येथील टायगर ग्रुपच्या तरुणांनी व्यायाम, वृक्ष लागवड व पर्यावरण संतुलनाचा प्रचार-प्रसार करत तब्बल 1100 किलोमीटरचा पायी प्रवास 21 दिवसांत पूर्ण करत हरिद्वार, केदारनाथांसह अनेक तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले.

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील मानाई वस्तीवरील टायगर ग्रुपचे सदस्य पैलवान भगवान कांदळकर यांच्या संकल्पनेतून ही संदेश देणारी यात्रा कोपरगावच्या तरुणांनी पूर्ण केली. भगवान कांदळकर, संदीप परजणे, मंगेश मुर्तडक, श्याम कासार, केदार कासार या तरुणांचा या प्रवासात सहभाग होता. स्वर्गीय पैलवान रंगनाथ कांदळकर यांच्या स्मरणार्थ पैलवान दीपक कांदळकर व पैलवान भगवान कांदळकर यांनी तरुणांसाठी व्यसनमुक्ती, व्यायाम व मोफत कुस्तीचे धडे देण्याचे काम पुढे चालू ठेवले आहे. आत्ताचा तरुण मोबाईल व व्यसनाच्या आहारी जाऊन कमकुवत होत चालला आहे. तरुण वयात व्यायाम केला तरच उतरत्या वयात अनेक आजार माणसापासून लांब राहतात. दररोज किमान दहा किलोमीटर तरी तरुणांनी पायी चालत व्यायाम केला पाहिजे, असे प्रवासादरम्यान भगवान कांदळकर जागोजागी थांबून तरुणांना मार्गदर्शन करत होते.

या 26 दिवसांत त्यांनी हरिद्वार, ऋषीकेश, देवप्रयाग, रुद्रप्रयाग, सोनप्रयाग, केदारनाथ, पंचकेदार, पंचबद्री, पंचप्रयाग आदी ठिकाणी पायी प्रवास करत तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले. 26 दिवस चाललेल्या या प्रवासात अनेक ठिकाणी पाऊस, दरडी कोसळण्याच्या घटना आदी प्रसंगाला या तरुणांनी तोंड दिले. प्रवास करून कोपरगावला आल्यानंतर त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

Visits: 160 Today: 1 Total: 1793087

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *