शिवसेनेच्या भाग्यश्री मोकाटेंवर मोक्का, भाजपकडून खच्चीकरण! माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची मुख्यमंत्र्यांकडे न्याय देण्याची मागणी

नायक वृत्तसेवा, राहुरी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूरमध्ये झालेल्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जात होता. सेनेच्या कार्यकर्त्यांना तडीपार केल जात होतं, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला होता. एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी देखील हा आरोप केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी फेसबुक पोस्ट करुन एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या जिल्हा परिषद भाग्यश्री मोकाटे यांना न्याय देण्याची मागणी केली. मोकाटे यांच्यासारख्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करणार्‍या भाजपची साथ सोडून परत महाविकास आघाडीमध्ये यावं, असं आवाहन तनपुरे यांनी एकनाथ शिंदे यांना केलं आहे.


आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांबद्दल मला आदर आहे. साहेबांनी त्यांच्या भाषणात आज सांगितलं की शिवसैनिकांवर तडीपारी केली जात होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसैनिकांचं खच्चीकरण केलं जात होतं. मला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणावेसे वाटते की युती सरकारच्या काळात 5 वर्षांपूर्वी आपल्याच पक्षाची अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्या भाग्यश्री मोकाटे हिच्यावर मोक्का लावण्यात आलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे पदवीचा अभ्यास करत असताना एका गंभीर गुन्ह्यात बिचार्‍या भाग्यश्रीचा काही संबंध नसताना गोवण्यात आले आणि तिचं व कुटुंबाचं आयुष्य उध्वस्त करण्यात आलं.

आता हे खच्चीकरण तत्कालीन सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद व गृहमंत्रीपद सांभाळणार्‍या भाजपने केलं का याचा आपण कृपया विचार करावा. आणि कृपया भाग्यश्रीला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. मी आपला स्वभाव जवळून बघितला आहे. आपण नक्कीच कृपादृष्टीने विचार करून शिवसेनेची जिल्हा परिषद सदस्या भाग्यश्री मोकाटे हिला न्याय मिळवून द्याल अशी अपेक्षा करतो. तसेच शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांचं अशा पद्धतीने खच्चीकरण करणार्‍या भाजपची साथ सोडून पुन्हा महाविकास आघाडीसोबत याल अशी अपेक्षा व्यक्त करतो, असं प्राजक्त तनपुरे म्हणाले.

बंडखोरांकडे कारण नव्हतं : शरद पवार
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर या मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीचे मंत्री अधिक काम करतात, प्रश्न सोडवतात, हे मी आघाडीच्या आमदारांकडून ऐकलं आहे, असं शरद पवार म्हणाले. आता काही जणांनी जो निर्णय घेतलाय त्यांच्याकडे सांगायला काही नसल्यानं ते असं बोलतात, असं शरद पवार म्हणाले. मी याला बंड, उठाव आणि गद्दारी म्हणणार नाही, असं शरद पवार म्हणाले. हा निर्णय घेणार्‍यांना काही तरी प्रभावशाली मिळालं असेल, असं शरद पवार म्हणाले.

Visits: 134 Today: 1 Total: 1582860

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *