वटपौर्णिमा म्हणजे वृक्षमैत्रीचा संदेश देणारा अनोखा सण ः जाखडी संगमनेरातील सराफ कॉलनी येथे पुरोहित प्रतिष्ठानच्यावतीने वटपूजन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
‘वटपौर्णिमा म्हणजे वृक्षमैत्रीचा संदेश देणारा जगातील एक अनोखा सण आहे. जो वृक्ष वाढवतो तो स्वतःच्या तसेच समाजाच्याही जीवनातील आनंद वाढवतो. आरोग्याचा स्तर उंचावतो म्हणून वृक्षारोपण मोहीम प्रत्येकाने योगदान देऊन वाढवली पाहिजे’, असे प्रतिपादन पुरोहित प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊ जाखडी यांनी केले.

वटसावित्री पौर्णिमेनिमित्त संगमनेरातील सराफ कॉलनी येथे प्रतिष्ठानच्यावतीने महिलांसाठी वटवृक्ष पूजनाचा विधीवत सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थित भगिनींना मार्गदर्शन करताना जाखडी यांनी वरील उद्गार काढले. या सोहळ्यात श्वेता सराफ, अर्चना सराफ, प्रतीक्षा सराफ, लता खिल्लारी, आरती सराफ, आरती कुलकर्णी, निशा कुलकर्णी, स्मिता सराफ, संयुक्ता सराफ, तृप्ती कुलकर्णी, वैशाली कुलकर्णी यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.

‘वटवृक्षाचे आरोग्याच्या दृष्टीने असलेले असंख्य फायदे अभ्यासल्यानंतर आपल्या पूर्वजांनी वटवृक्ष जतन करणे वृद्धिंगत करणे या हेतूने वटपौर्णिमा व्रताचा अंगीकार केला. सत्यवान आणि सावित्रीच्या कथेतून हाच संदेश देण्यात आला आहे की मोठ्या प्रमाणात प्राणवायू देणारा जीवदान देण्याची क्षमता असलेला हा वृक्ष मानवाला वरदान आहे. मागील अनेक वर्षांपासून सदर उपक्रमास भगिनी मोठ्या संख्येने प्रतिसाद देतात. त्यांनी पूजन केलेले वटवृक्ष रोप त्यांच्याच हस्ते अनेक ठिकाणी लागवड करण्यात येते, अशी माहिती जाखडी यांनी यावेळी दिली. त्यामुळे मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे सहजपणे शक्य झाले आहे. नारीशक्ती किती किमया करू शकते हे यातून दिसून आले आहे. प्रतिष्ठानचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.
