‘त्या’ वक्तव्यावरुन खासदार डॉ. सुजय विखे पाटलांचा यू टर्न! पारनेर तालुक्याच्या राजकीय परिस्थितीवरुन केले होते भाष्य

नायक वृत्तसेवा, नगर
शिवसेनेच्या संदर्भात केलेले भाष्य हे फक्त पारनेर तालुक्याच्या राजकीय परीस्थीतीच्या पार्श्वभूमीवर होते. परंतु त्याचा राज्याच्या राजकारणाशी संबंध जोडून विपर्यास केला गेला. अहमदनगर जिल्ह्यात राजकीय निर्णय घेताना प्रदेश भाजपा पदाधिकार्यांचाच अंतिम आदेश मानला जाईल, अशी भूमिका खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आता स्पष्ट केली आहे. पारनेर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले होते मला निवडून आणण्यात शिवसैनिकांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यामुळे कारवाई झाली तरी आपण शिवसेनेसोबत राहू मात्र आता यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

पारनेर तालुक्याच्या बदलत्या राजकीय वातावरणात शिवसैनिकांवर होत असलेला अन्याय तसेच राज्यात आघाडी सरकार असतानाही तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा होत नसलेला विचार पाहाता या कार्यकर्त्यांच्या पाठिशी उभे राहाण्याची किंवा त्यांना बरोबर घेवून जाण्याच्या दृष्टीने आपण भाष्य केले. परंतु माझ्या वक्तव्याचा थेट राज्यातील राजकारणाशी संबंध जोडून विपर्यास केला असल्याचे विखे पाटील म्हणाले. जिल्ह्यात कोणतीही राजकीय भूमिका किंवा निर्णय करताना अंतिम निर्णय हा प्रदेश आणि जिल्ह्यातील भाजपा पदाधिकार्यांना विश्वासात घेवूनच करण्याची भूमिका आपली कायम असून याबाबतचा अंतिम निर्णय सुध्दा त्यांचाच असणार आहे. पारनेर तालुक्याच्या राजकीय परिस्थितीची वस्तुस्थिती आपण वरिष्ठांना देवून यासंदर्भात चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘मी खासदार म्हणून निवडून येण्यात पन्नास टक्के वाटा येथील शिवसेनेचा आहे, याची मला जाणीव आहे. त्यामुळेच गेल्या तीन वर्षांच्या काळात मी कधीही शिवसेनेच्या विरोधात बोललो नाही. मातोश्रीच्या विरोधात, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधातही मी कधी बोललो नाही. माझे आजही हेच मत आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना संपविण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्यसभेच्या निकालावरून ते पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ठाकरे यांनी वेळीच सावध व्हावे, हे मी सांगत आहे. माझे काही कार्यकर्ते शिवसेनेत गेले. मला त्याची खंत वाटली नाही. केवळ पारनेर तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातच भाजप आणि पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेशी एकनिष्ठ राहील. जेव्हा केव्हा शिवसेनेवर संकट येईल, तेव्हा मी या अहमदनगर जिल्ह्यातील शिवसैनिकांना एकटे सोडणार नाही. यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर कारवाई केली तरी चालेल. असे बोलण्याची हिंमत ठेवणारा मी भाजपचा एकमेव खासदार आहे. ही हिंमत माझ्यामध्ये आहे, कारण मी येथील राजकारण ओळखतो, असं विखे म्हणाले होते.
