काजवा महोत्सव बरेच दिवस रेंगाळण्याची शक्यता! भंडारदर्याचा पाऊस लांबणार; टेंटधारक व हॉटेल्स मात्र सज्ज..
नायक वृत्तसेवा, भंडारदरा
अकोल्यातील पश्चिमेला असणार्या सह्याद्रीच्या खोर्यामध्ये गत काही वर्षांपासून काजवा महोत्सव साजरा होत आहे. हा महोत्सव यावर्षी 15 मेपासून कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात वन्यजीव विभागाकडून आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवासाठी परिसरातील हॉटेलधारक व टेंटधारक सज्ज झाले आहेत. पंरतु यावर्षी निसर्गाचा रानमेवा व फळांचा राजा आंबा अद्यापही पाडाला न लागल्यामुळे भंडारदर्याचा पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता परिसरातील वयोवृद्ध आदिवासी व्यक्तींनी व्यक्त केली आहे. त्यामुळे काजवा महोत्सवही बरेच दिवस रेंगाळण्याची शक्यता आहे.
भंडारदरा धरणाच्या परिसरामध्ये कोरोनाचे वातावरण थंड झाल्यानंतर काजवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असले तरी पर्यावरणवादींनी काजवा हा कीटक वाचावा व निसर्ग चक्र सुरळीत चालावे म्हणून समाज माध्यमांवर ‘काजवा बचाव’ या विषयावर लेख प्रसिद्ध केले आहेत. एका बाजूला काजवा महोत्सव आयोजक व दुसर्या बाजूला पर्यावरणवादी असे दोन्ही गट एकाचवेळी समाज माध्यमांवर चमकताना दिसून येत असल्यामुळे एकप्रकारे समाज माध्यमांवर काजव्यांचे युद्धच सुरु झाले की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गाड्यांच्या दिव्यांचा प्रखर प्रकाश व कर्णकर्कश हॉर्नमुळे काजव्यांचे अस्तित्वच संपुष्टात येत असल्याचे म्हणणे पर्यावरणवादींचे असून काजवा कसा वाचविता येईल याचे नियोजन करत काजवा महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून मिळाली आहे.
भंडारदर्याच्या अभयारण्यात असणार्या स्थानिकांची उपजीविकाच पर्यटनावर अवलंबून असल्याने काजवा महोत्सव व्यवस्थित पार पाडून काजव्यांच्या कालचक्रावर थोडाही विपरीत परिणाम होणार नाही यासाठी नाशिक वन्यजीव विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी गणेश रणदिवे वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरुन महोत्सव व्यवस्थित पार पाडण्यास सज्ज झाले आहेत. यासाठी वन विभागाच्या हद्दीत असणार्या ग्रामपंचायत व वन समित्यांची विशेष मदत घेण्यात येत आहे. काजवा ज्या परिसरातील झाडावर आढळून येतो त्याठिकाणापासून कमीत कमी शंभर ते दीडशे मीटर अंतरावर गाडी उभी करुन काजवे बघण्यासाठी पायी चालत जावे लागणार आहे. वन विभागाच्या हद्दीत दहा ते बारा ठिकाणी पार्किंग झोन उभारण्यात आले असून पर्यटकांच्या वाहनांच्या तपासणीसाठी जागोजागी टोलनाकेही उभारण्यात आले आहेत.
दरम्यान, अभयारण्यात दरवर्षी एप्रिल महिन्याच्या तिसर्या आठवड्यातच डोंगरची काळी मैना (करवंदे) पिकण्यास सुरुवात होत असते. यावर्षी मात्र मे महिन्याचा पहिला आठवडा उलटूनही करवंदे अद्यापही पिकलेली दिसून येत नाही. तर फळांचा राजा ‘आंबा’ हा पाडव्यालाच पाडाला येत असतो. पंरतु यंदा मात्र आंबा अजूनही कुठे पिकलेला आढळून येत नाही. उशिरा झालेले हे निसर्गाचे कालचक्र निश्चितच विचार करण्याजोगे आहे. ज्यावर्षी आंबा, करवंदे उशीरा पिकतात, त्यावर्षी पाऊस उशीरा सुरु होतो असे भंडारदरा परिसरातील वृद्धांच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे. पाऊस जर उशीरा सुरु होणार असेल तर निश्चितच काजवा महोत्सव हा रेंगाळणार असून भंडारदर्याला मात्र पर्यटकांच्या रुपात चलती दिसणार आहे. म्हणूनच भंडारदरा परिसरातील टेंटधारक व हॉटेल्स काजवा महोत्सवासाठी सज्ज झाली आहेत.