उन्हापासून पिकाचा बचाव करण्यासाठी शेतकर्‍याचा अभिनव प्रयोग! एक एकरावरील कोबीला केले आच्छादन, भाजीपालावर्गीय पिकासाठी पहिल्यांदाच प्रयोग..

महेश पगारे, अकोले
सध्या सूर्य अक्षरशः आग ओकत आहे. त्यामुळे शेतीपिकांना मोठा फटका बसत आहे. मात्र, सावरगाव पाट (ता.अकोले) येथील शेतकर्‍याने उन्हापासून पिकाचा बचाव होण्यासाठी संपूर्ण पिकालाच इन्सेक्ट नेटयुक्त कागदाचे आच्छादन करण्याचा अभिनव प्रयोग केला आहे. बहुधा आढळा खोर्‍यात हा पहिलाच प्रयोग असण्याची शक्यता आहे.

सावरगाव पाट येथील प्रयोगशील शेतकरी रोहिदास नेहे यांनी हा प्रयोग राबविला आहे. त्यांनी मार्च महिन्यात एक एकर क्षेत्रावर आईसबर्ग कोबीची लागवड केलेली आहे. हा वाण चायनिज असून, त्याचे उन्हापासून संरक्षण होणे गरजेचे असते. त्यामुळे शेतकरी नेहे हे चिंतेत सापडलेले असताना त्यांना पीक आच्छादन करण्याची कल्पना सूचली. त्यानुसार त्यांनी संपूर्ण पिकालाच आच्छादन करण्याचा निर्णय घेतला.

इन्सेक्ट नेटयुक्त कागद सरीवर लागवड असलेल्या कोबीवर टाकला आहे. यासाठी साधारण 40 हजार रुपयांचा खर्च आलेला आहे. यामुळे पिकाचे शाश्वत संरक्षण होवून उत्पादनात कोणतीही घट होणार नाही. यांसह अनेक फायदे पीक आच्छादनापासून होत असल्याचे शेतकरी नेहे यांचे म्हणणे आहे. यापूर्वी अवकाळीपासून द्राक्ष पिकाचा बचाव करण्यासाठी पीक आच्छादनाचा प्रयोग झाला होता. मात्र, भाजीपालावर्गीय पिकासाठी हा पहिल्यांदाच प्रयोग झाला आहे.

पीक आच्छादनामुळे मुख्यतः उन्हापासून संरक्षण होते. तसेच पाणी, खत व औषघ फवारणीची देखील बचत होते. याशिवाय बंदिस्त असल्याने रोगांपासून देखील बचाव होतो.
– रोहिदास नेहे (प्रयोगशील शेतकरी)

Visits: 138 Today: 1 Total: 1588785

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *