शेतकर्‍यांनी अनुदानित सौर पंप बसवावे ः तनपुरे भारनियमानाला केंद्र सरकार जबाबदार असल्याचाही आरोप

नायक वृत्तसेवा, राहुरी
सध्याच्या पद्धतीने वीज निर्मितीसाठी कोळशाचा वापर सर्वाधिक होतो. आगामी पंधरा-वीस वर्षांत देशातील कोळशाचा साठा संपणारच आहे. त्यावेळी सौर ऊर्जेशिवाय पर्याय नाही. सध्या शेतकर्‍यांना सौर पंपासाठी अनुदान मिळत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी हे पंप बसवून घ्यावेत, असा सल्ला ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे.

राहुरी तालुक्यात एका एका वीज उपकेंद्राच्या उभारणीच्या कामाचा प्रारंभ तनपुरे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. सध्याच्या भारनियमानाला केंद्र सरकार जबाबदार असल्याचे सांगत त्यांनी केंद्र सरकारवर टीकाही केली. राज्यमंत्री तनपुरे म्हणाले, ‘सध्या राज्यावर वीज भारनियमनाचे संकट कोसळण्यामागे केंद्र सरकारचे धोरण कारणीभूत आहे. केंद्र सरकारला वीज कंपन्यांचे खासगीकरण करायचे आहे. त्यामुळे या कंपन्यांची अडवणूक करण्यात येत आहे. सध्या विजेची वाढती मागणी आणि तुलनेत होत असलेला तुटवडा यावर वीज निर्मिती वाढविणे हाच पर्याय आहे. सध्या कोळशाची टंचाई असल्याने भारनियमन करावे लागत आहे. मात्र, आगामी पंधरा-वीस वर्षांत देशात कोळशाचा साठा संपणार आहे.’

यावेळी सौर ऊर्जेशिवाय पर्याय नाही. सध्या सौर ऊर्जेसाठी अनुदान योजना आहे. त्याचा फायदा घेऊन शेतकर्‍यांनी सौर ऊर्जेवर चालणारे कृषीपंप बसवून घ्यावेत. तसेच शेतकर्‍यांनी वीजबिल सवलत योजनेचा लाभ घ्यावा. वीजगळती कमी करुन, जाळे विस्तारुन पूर्ण दाबाने वीज देण्यासाठी महावितरण कसोशीने प्रयत्नशील आहे, त्यासाठी शेतकरी आणि वीज ग्राहकांची साथ हवी आहे, असेही तनपुरे म्हणाले.

Visits: 181 Today: 2 Total: 1788010

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *