कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याचा वर्धापन दिन साजरा वन संरक्षणात उल्लेखनीय कामगिरी करणार्यांचाही केला गौरव

नायक वृत्तसेवा, भंडारदरा
कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याचा 36 वा वर्धापन दिन शेंडी (ता.अकोले) येथे मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.

सेवानिवृत्त वनसंरक्षक अंजनकर यांच्या अध्यक्षतेखाली हा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मानद वन्यजीव रक्षक अहमदनगर डॉ. सुधाकर कुराडे हे होते. तसेच अभयारण्य क्षेत्रातील समिती अध्यक्ष, सरपंच, सदस्य, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी वन संरक्षणात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अध्यक्ष, सदस्य व वनविभागातील कर्मचार्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

अतिदुर्गम घाटघर येथील निसर्ग कवी खडके, पांजरी येथील मीनानाथ उघडे, लव्हाळवाडी येथील रावजी मधे व पोकळे यांनी आदिवासी लोकसंस्कृतीची जोपासना करून निसर्गाच्या संवर्धनात व संरक्षणात मोलाची कामगिरी केल्याने त्यांना प्रमाणपत्र व पाच हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. आदिवासी लोकसंस्कृती वाढीसाठी योग्य ती मदत करण्याचे आश्वासनही अधिकार्यांनी दिले. सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी अभयारण्यातील सर्वांचे आभार मानून वनसंरक्षण व आदिवासी लोकसंस्कृती यांची जोपासना व संवर्धन करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. सदर कार्यक्रमास वन परिक्षेत्राधिकारी डी. डी. पडवळे, भंडारदरा वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे, शेंडीचे मुख्याध्यापक रोंगटे, टायगर सेल सदस्य पाटील, वनपाल सोनार, धिंदळे, मुठे, लांडे, चव्हाण, वनरक्षक गिते, तळपाडे, पाटील, रतनवाडी, कोलटेंभे, पांजरे उडदावणे येथील सरपंच उपस्थित होते.
