खंदरमाळ येथे माळरानावर फुलविली गुलाबाची बाग! प्रयोगशील शेतकरी रवींद्र लेंडेंच्या जीवनात दरवळला सुगंध..

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याचा पठारभाग म्हटला की चटकन डोळ्यासमोर दुष्काळ येतो. तरी देखील येथील विविध समस्यांवर मात करुन यशस्वी शेती करत आहे. खंदरमाळ येथील प्रयोगशील शेतकरी रवींद्र लेंडे यांनी खडकाळ माळरानावर गुलाबाची बाग फुलवली आहे. यामुळे त्यांना हक्काचा आर्थिक स्त्रोत उपलब्ध होणार असून, त्यांच्या जीवनात गुलाबाचा सुगंध दरवळत हे निश्चित आहे.

प्रयोगशील शेतकरी रवींद्र लेंडे यांना पहिल्यापासूनच शेतीची प्रचंड आवड असल्याने ते पॉलिहाऊस व शेडनेटमध्ये ढोबळी मिरची, काकडी अशी पिके घेतात. त्यातच हा संपूर्ण परिसर खडकाळ माळरानावर वसलेला आहे. त्यामुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. मात्र अशा कठीण परिस्थितीतही लेंडे यांनी एक एकरमध्ये पॉलिहाऊसची उभारणी केली आहे. त्यामध्ये त्यांनी गुलाबाची लागवड केलेली आहे. परंतु, पाण्याची कमतरता असल्याने त्यांनी पॉलिहाऊसवरुन वाहून जाणारे पावसाचे पाणी अडवून पाईपद्वारे शेततळ्यात सोडून दिले आहे.

या प्रयोगामुळे पाण्याची समस्या सुटली असून, आज त्यांची गुलाबाची शेती बहरली आहे. विशेष म्हणजे पाण्याची बचत व्हावी म्हणून त्यांनी गादी वाफे तयार करत त्यामध्ये नारळ्याच्या शेंड्यांचा भुस्सा टाकला आहे. त्यावर गुलाबाची लागवड केली आहे. यामुळे गुलाबाची झाडेही टवटवीत राहत आहे. सध्या फुलांची काढणी सुरू असून, ही फुले 20 फुलांचा गुच्छ व्यवस्थितरित्या बांधून व्यापार्‍यांना पाठवत आहे. यातून चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

गुलाबाच्या फुलांची अतिशय काळजी घ्यावी लागते. तेव्हाच फुले टवटवीत राहतात. यापूर्वीही अशाच पद्धतीने गुलाबाची बाग फुलवली होती. मात्र त्यावेळी निसर्गाच्या संकटांचा सामना करावा लागला होता. अनेक शेतकरी ही बाग पाहण्यास आवर्जुन भेट देत आहे.
– रवींद्र लेंडे (गुलाब उत्पादक)

Visits: 131 Today: 2 Total: 1102398

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *