घारगाव पोलिसांनी सहा दुचाकी केल्या जप्त तिघांना अटक; धडाकेबाज कारवाईचे नागरिकांतून कौतुक

नायक वृत्तसेवा, घारगाव
गेल्या काही दिवसांपासून संगमनेर तालुक्याच्या पठारभागात दुचाकी चोर्‍यांचे सत्र सुरू आहे. मात्र, घारगाव पोलिसांच्या पथकाने तिघांच्या मुसक्या आवळत सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. या धडाकेबाज कामगिरीबद्दल पोलिसांचे नागरिकांतून कौतुक होत आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, संदीप जयसिंग बर्डे (वय 28, रा.लहुचा मळा, नांदूर खंदरमाळ, ता. संगमनेर), रवींद्र दत्तात्रय पवार (वय 19, रा. चिल्लारी, वडगाव सावतळ, हल्ली रा. पिंपरखेड, ता. पारनेर), भारत तुकाराम वाघ (वय 30, रा. कजबे सुकेणे, ता. निफाड) ह्या तिघा सराईत चोरट्यांनी दुचाकी चोरल्या असल्याची माहिती खबर्‍याकडून पोलिसांना समजली होती. त्यानुसार तिघांकडून एमएच.15, जीवाय.0641, एमएच.16, बीए.5847, एमएच.15, डीआर.9682, एमएच.17, डब्ल्यू.9883, एमएच.17, एए.7255, एमएच.17, एपी.0629 अशा सहा दुचाकी जप्त केल्या आहेत.

या धडाकेबाज कारवाईत पोलिसांनी तिघांना अटक केली असून, संबंधित दुचाकी क्रमांकाच्या मालकांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य हवालदार दशरथ वायाळ, रामभाऊ भुतांबरे, पोलीस नाईक संतोष खैरे, संतोष फड, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, गणेश तळपाडे, हरिश्चंद्र बांडे आदिंनी केली आहे. या कारवाईचे नागरिकांतून कौतुक होत आहे.

Visits: 154 Today: 1 Total: 1949672

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *