साईभक्तांचे मंडळ म्हणून संस्थानचा कारभार करणार ः काळे नूतन विश्वस्त मंडळाने तदर्थ समितीकडून स्वीकारला पदभार

नायक वृत्तसेवा, शिर्डी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांनी विश्वस्त मंडळावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू. साईभक्त, ग्रामस्थ यांना सोबत घेऊन साईभक्तांचे मंडळ म्हणून संस्थानचा कारभार करणार असल्याचा विश्वास साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे नूतन अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.

शिर्डीच्या श्री साईबाबा देवस्थानच्या विश्वस्त मंडळाची महाराष्ट्र शासनाने 16 सप्टेंबर, 2021 रोजी पात्रताधारक 12 सदस्यांची नावे जाहीर करून अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आशुतोष काळे यांची निवड केली होती. परंतु राज्य शासनाकडून संपूर्ण विश्वस्त मंडळाची नेमणूक न केल्यामुळे नूतन अध्यक्ष व विश्वस्तांना संस्थानचा पदभार स्वीकारण्यापासून मनाई करण्यात आली होती. त्या आदेशाच्या विरोधात नूतन अध्यक्ष आमदार काळे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. त्याबाबत मंगळवारी (ता.30) सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा अध्यक्ष व विश्वस्त मंडळास कार्यभार करण्यापासून मज्जाव करण्याचा आदेश रद्द करून पदभार स्वीकारण्याची परवानगी दिली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नूतन विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे व विश्वस्त यांनी तदर्थ समितीचे अध्यक्ष, प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लागड्डा यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी पत्रकारांशी वार्तालाप करताना अध्यक्ष आमदार काळे बोलत होते.

याप्रसंगी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, नूतन उपाध्यक्ष जगदीश सावंत, नूतन विश्वस्त सुरेश वाबळे, डॉ. एकनाथ गोंदकर, अनुराधा आदिक, सुहास आहेर, अविनाश दंडवते, सचिन गुजर, राहुल कनाल, जयवंत जाधव, महेंद्र शेळके आदी उपस्थित होते. साईभक्तांच्या अडचणी, रुग्णालयाचे प्रश्न, कर्मचारी व ग्रामस्थांच्या समस्या संस्थानच्या व माध्यमातून सामोपचाराने सोडविण्याचा विश्वस्त मंडळ सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. ऑनलाईन दर्शनामुळे साईभक्तांना होत असलेल्या त्रासाची दखल घेऊन ऑफलाईन दर्शन पास सुरू करावे, अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली होती. त्या मागणीला जिल्हाधिकार्‍यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन ऑफलाईन दर्शन पास सुरू करण्यास परवानगी दिली असल्यामुळे साईभक्तांची अडचण दूर झाली आहे. अनेक साईभक्तांची भोजनालय सुरू करण्याची मागणी लक्षात घेऊन भोजनालय देखील जिल्हाधिकार्‍यांच्या अधिकारात सुरू केले आहे. यापुढे देखील साई भक्तांना येणार्‍या अडचणी सोडविण्यासाठी त्या-त्यावेळी तातडीने उपाययोजना करण्यास विश्वस्त मंडळ नक्कीच तत्परतेने निर्णय घेईल, अशी ग्वाही अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी दिली. तसेच शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त यांना अपेक्षित असलेल्या सुखसोयी उपलब्ध करून देऊन पारदर्शक कारभार करणार असल्याचेही नमूद केले.

Visits: 116 Today: 2 Total: 1115045

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *