वायू प्रदूषण टाळण्यासाठी इंधनविरहित वाहने वापरा ः तांबे संगमनेरात पालिका, लायन्स क्लब आणि महाविद्यालयाची सायकल फेरी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आजच्या विज्ञान युगात मानवाने सर्व क्षेत्रांत मोठी प्रगती केली आहे. मात्र मानवाच्या चुकांमुळे वातावरणातील जल, अग्नी, वायू, ध्वनि व आकाश यांमध्ये होणारे प्रदूषण, तसेच इंधनयुक्त वाहनांच्या अतिवापरामुळे वाहनातून निघणार्या धुरामुळे हवेत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. यामुळे आठवड्यातील एक दिवस विजेवर चालणारी वाहने व सायकल वापरण्याचे आवाहन नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी केले.

संगमनेर नगरपरिषद, लायन्स क्लब ऑफ संगमनेर व संगमनेर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या सायकल सायकल फेरीच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी मुख्याधिकारी राहुल वाघ, लायन्स क्लब ऑफ संगमनेरच्या प्रेसिडेंट सुनीता पगडाल, राखी कारवा यांसह संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी डॉ. सचिन कदम, जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. प्रताप फलफले, डॉ. वसंत खरात, डॉ. कुसमुडे, डॉ. बाळासाहेब पालवे, प्रा. सागर श्रीमंदीलकर, नगरपरिषदेचे नोडल प्रमुख प्रमोद लांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्य शासनाच्यावतीने राज्यातील सर्व नगरपरिषदांसाठी पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी ‘माझी वसुंधरा अभियानांतर्गत’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून संगमनेर नगरपरिषद, संगमनेर महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना व लायन्स क्लब ऑफ संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपरिषदेच्या विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी यांच्या संयुक्त सहभागाने नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्या नेतृत्वाखाली व मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. संगमनेर महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरु झालेली सायकल फेरी बस स्थानक, नवघर गल्ली, तीन बत्ती चौक, मेन रोड या शहरातील प्रमुख मार्गावर येऊन नगरपरिषदेच्या प्रांगणात समारोप करण्यात आला. विजेवर चालणार्या वाहनांचा जास्तीत जास्त वापर करावा. तसेच आठवड्यातील एक दिवस सायकलचा व विजेवर चालणार्या वाहनांचा वापर करण्याचे आवाहन यानिमित्ताने नगराध्यक्षा तांबे यांनी केले.
