कोपरगाव कारागृहात कोरोना नियम पायदळी

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
राज्यात कोरोनाची तिसरी लाट डोके वर काढण्याची शक्यता असताना येथील कोपरगाव दुय्यम कारागृहात कोरोनाच्या नियमांची ‘ऐसी की तैशी’ होत आहे. केवळ चार बराकींत तब्बल एकशे एक आरोपींना ठेवण्यात आले आहे. त्यामुळे तुरुंग प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. आरोपींच्या हक्कांची पायमल्ली होऊन त्यांना सुविधा मिळत नसल्याची बाब पुढे आले आहे.

तहसील कार्यलयाजवळ दुय्यम कारागृह आहे. कारागृहाच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक आरोपींची संख्या सध्या येथे आहे. एकूण पाच बराकी असून, 16 आरोपींना ठेवण्याची त्यांची क्षमता आहे. एक महिलांसाठी राखीव आहे. एक महिला आरोपीला राहुरी कारागृहात स्थलांतर केले आहे. कारागृहात चार तृतीयपंथी आरोपी असल्याने त्यांना एक स्वतंत्र बराक देण्यात आली, तर उर्वरित चार बराकींत प्रत्येकी 26 ते 27 आरोपींना अक्षरशः जनावरांसारखे कोंबण्यात आले आहे. कोपरगाव, राहाता, शिर्डी, लोणी परिसरातील खून, चोरी, रस्तेलूट, कौटुंबिक वाद आदी प्रकारांतील हे आरोपी असून सर्वाधिक आरोपी राहाता तालुक्यातील आहेत. दहा बाय बाराची एक बराक असून, त्यातच आरोपींसाठी लघुशंका, शौचालयाची सोय करण्यात आली आहे. कोविड नियमांची तर सर्रास पायमल्ली होत आहे. झोपण्याच्या जागेअभावी गेल्या आठवड्यात आरोपींमध्ये हाणामारी झाली. याबाबत गुन्हाही दाखल आहे. आरोपींची संख्या वाढल्याने तुरुंग प्रशासन व पोलीस प्रशासनावर अतिरिक्त ताण पडत आहे. आरोपींना आरोग्य सुविधा देताना प्रशासनाची तारेवरची कसरत सुरू आहे. चार बराकींत एकशे एक आरोपींना ठेवण्यात आल्याने त्यांना झोपण्यासाठी देखील जागा नाही. जागेवरून त्यांच्यात अनेक वेळा हाणारमार्याही होत आहेत. प्रशासनाने त्यावर नवा फंडा शोधला आहे. आरोपींना झोपण्यासाठी शिफ्ट ठरवून दिली आहे. त्यामुळे त्यांना दिलेल्या वेळेतच झोपावे लागत आहे.

बराकीतील आरोपींची संख्या कमी करण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहेत. न्यायालयात अर्ज दाखल केला असून, 60 आरोपींची रवानगी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. न्यायालयाने केवळ तीन आरोपींना स्थलांतरित करण्याचे आदेश दिले आहेत.
– अरुण रणनवरे (तुरुंग निरीक्षक)
