… अद्यापही अनेक तालुक्यांत ‘वात्सल्य समिती’ स्थापनच नाही! कोरोनाने पती गमावलेल्या महिलांसाठी सरकारने जाहीर केली योजना

नायक वृत्तसेवा, अकोले
राज्याच्या महिला व बाल कल्याण विभागाने कोरोनामुळे पती गमावलेल्या राज्यातील 20 हजार महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्हणून 27 ऑगस्ट, 2021 रोजी ‘वात्सल्य समितीचा’ जीआर प्रसिद्ध केला. त्याला आता एक महिना झाला तरीही राज्यातील बहुतेक तालुक्यात अजूनही ही समिती स्थापनच झाली नाही. त्यामुळे सरकारने निर्णय घेतल्याप्रमाणे यासंबंधीचे काम अद्याप सुरू झाले नाही.

वात्सल्य समिती ही विधवा महिलांसाठी विविध योजना राबवाव्या यासाठी स्थापन करायची आहे. त्यामार्फत या महिलांना विविध कागदपत्रे व योजना तालुकास्तरावर राबवायच्या आहेत. ‘महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती’च्यावतीने कार्यकर्त्यांनी शंभरपेक्षा जास्त तालुक्यात तहसीलदारांना जीआर प्रसिद्ध होताच निवेदने दिली. समिती स्थापन करण्याची विनंती केली. अनेकदा जाऊन तहसीलदार यांना पाठपुरावा केला. मात्र खूप कमी ठिकाणी प्रतिसाद मिळाला आहे, अशी माहिती यासाठी पुढाकार घेतलेले हेरंब कुलकर्णी यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासासाठी बैठक घेतली होती. त्यांच्या आदेशानंतर जीआर निघाला. मात्र, त्यापुढील कार्यवाही रखडली आहे. महिला बालकल्याण समितीच्या सचिवांकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यांनी तातडीने कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले होते.

प्रत्यक्षात महिना उलटला तरी समित्या स्थापन होऊ शकल्या नाहीत. आधीच सरकारने निर्णय घेण्यास उशीर केला आहे. त्यात या समित्या स्थापन केव्हा होणार, त्यांच्या बैठका, शिफारशी आणि प्रत्यक्ष मदत मिळण्यास किती वेळ लागणार हे आता सांगता येत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आज पुन्हा एकदा याच्या पाठपुराव्यासाठी मोहीम राबविली. राज्यभरातून महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर आणि संबंधित अधिकार्‍यांना ई-मेल पाठवून या समित्या तातडीने स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रत्येक आठवड्याला बैठक घेण्याचा वार आणि वेळ नक्की करण्याचे आदेशही द्यावेत. दर महिन्याला या बैठकांचा आपण आढावा घ्यावा, अशी विनंती देखील करण्यात आली असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

Visits: 134 Today: 1 Total: 1423527

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *