‘प्रवरे’च्या कामगाराला ‘तनपुरे’च्या कामगारांनी फासले काळे! आंदोलनाला लागले वेगळे वळण; मुलांचाही आंदोलनात सहभाग

नायक वृत्तसेवा, राहुरी
येथील डॉ. बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांच्या आंदोलनाला आता वेगळे वळण आले आहे. संपकरी कामरागांनी कामावर असलेल्या प्रवरानगर कारखान्याच्या कामगारांना तालुक्यातून निघून जाण्याचा इशारा दिला आहे. कामावर आढळून आलेल्या कर्मचार्‍याच्या तोंडाला काळे फासण्यात आले. राहुरी कारखानाच्या कामगारांच्या मुलांनीही आता आंदोलनात भाग घेतला आहे.

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या अधिपत्याखाली हा कारखाना आहे. कामगारांचे पगार थकल्याने त्यांचे गेल्या दहा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मधल्या काळात खासदार विखे आणि अन्य नेत्यांनी कामगारांशी चर्चा केली. मात्र, तोडगा निघाला नाही. कारखान्याची आर्थिक कोंडी झाल्याने ही अडचण निर्माण झाली आहे. त्यातच निवडणूक जवळ आल्याने संचालक मंडळाला मुदतवाढ देण्याचा मुद्दाही गाजत आहे. महाविकास आघाडीचे सरकार आणि जिल्हा सहकारी बँकेकडून कोंडी केली जात असल्याचा आरोप खासदार विखे यांनी केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी यासाठी सध्याच्या संचालक मंडळालाच जबाबदार धरले आहे.

अशा परिस्थितीत सुरू असलेले कामगारांचे आंदोलन आणखी चिघळले. राहुरीचे सर्व कामगार संपावर आहेत. मात्र, विखे यांच्या प्रवरानगर येथील कारखान्याचे कामगार येथे कामावर येत असल्याने त्यांनी येथून परत जावे, असे राहुरीचे कामगार बजावत आहेत. इशारा देऊनही कामावर आलेल्या कामगारांना शोधून काढून त्यांना काळे फासून निषेध करण्यात आला. प्रवरेचा एकही कामगार कामावर आल्यास काळे फासण्याचा इशारा इंद्रभान पेरणे यांच्यासह कामगारांनी दिला होता. त्याप्रमाणे गुरुवारी (ता.2) सकाळी आंदोलक कामगारांनी कारखान्याच्या संलग्न संस्थेत शोध मोहीम राबविली. विवेकानंद नर्सिंग होममध्ये प्रवरेचा कर्मचारी बाहेरच्या बाजूने कडी लावून आतमध्ये डॉ. तनपुरे कारखान्याच्या हिशोबनीसाचे काम करीत होता. राहुरीच्या कामगारांनी त्याला बाहेर घेऊन काळे फासले.

यावेळी कामगार नेते पेरणे म्हणाले की, प्रवरेच्या कामगाराला फक्त हा इशारा आहे. यापुढे कामगार कोणते पाऊल उचलतील हे सांगता येणार नाही. प्रवरेच्या कामगारांनी राहुरीच्या कामगारांच्या भावना समजून घ्याव्यात. डॉ. तनपुरे कारखान्याच्या संलग्न संस्थेत कामावर येऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. राहुरी कारखान्याचा वीज पुरवठा बिल थकल्याने खंडीत केला आहे. त्यामुळे सुरक्षा कर्मचार्‍यांपुढे मोठे आव्हान आहे. अंधारात बॅटर्‍यांचा वापर करून कारखान्याची सुरक्षा सांभाळावी आहे. सुरक्षा कर्मचार्‍यांचेही पगार थकले आहेत. तरीही कर्तव्य भावनेतून आम्ही कामावर येत असल्याचे या कर्मचार्‍यांनी सांगितले.

Visits: 136 Today: 1 Total: 1415410

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *