हरिश्चंद्रगडाच्या माथ्यावरील पावसाने मुळेचा प्रवाह वाढला! भंडारदर्‍याला मात्र अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा; आदिवासी बांधवही चिंतेत..

नायक वृत्तसेवा, अकोले
जुलै महिन्याचा मध्य आला तरीही जिल्ह्यातील मोठ्या धरणांच्या पाणलोटात अजूनही पावसाला जोर नसल्याने भात शेती करणार्‍या आदिवासी बांधवांच्या चिंता वाढल्या आहेत. जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यात मुळा आणि प्रवरा या दोन्ही नद्यांच्या खोर्‍यात तुफान पर्जन्य बरसत असतो. यंदामात्र अजूनपर्यंत पावसाला रंग चढला नसल्याने धरणांमधील पाण्याची आवक रोडावलेलीच आहे. मात्र गेल्या चोवीस तासांत मुळा खोर्‍यातील पावसाचे आगार समजल्या जाणार्‍या हरिश्चंद्रगडाच्या माथ्यावर पावसाची संततधार सुरु असल्याने मोठ्या प्रतिक्षेनंतर मुळेच्या प्रवाहाने एक हजार क्युसेक्सचा टप्पा ओलांडला आहे. मागील काही दिवसांपासून या परिसरात अधुनमधून आषाढ सरींचा जोर वाढत असल्याने मुळा धरणातील पाण्याची आवकही संथगतीने सुरु आहे. मात्र दोन्ही धरणांच्या पाणलोटात अद्यापपर्यंत समाधानकारक पाऊस पडलेला नाही.

उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायी असलेल्या प्रवरा नदीच्या खोर्‍यातील घाटघर व रतनवाडी ही दोन ठिकाणं जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाचे आगार समजले जातात. दरवर्षी जुलैच्या सुरुवातीपासून या परिसरात पावसाचा अक्षरशः झंझावात सुरु असतो. त्यामुळे भंडारदरा धरणाच्या जलाशयाला कोंडाळे केलेल्या सह्याद्रीच्या शिखरांवरुन शेकडो जलप्रपात धरणीच्या दिशेने धाव घेत असल्याचे दृश्य दिसत असते. या कालावधीत परिसरातील निसर्ग सौंदर्य बहरत असल्याने राज्यातील विविध ठिकाणाहून हजारो पर्यटक येथे गर्दी करतात. यावर्षी मात्र जुलै महिन्याचा मध्य येवूनही भंडारदर्‍याच्या संपूर्ण पाणलोटात अजूनही पावसाला जोर नसल्याने या भागातील जलप्रपात दिसेनासे झाले आहेत.

मुळा नदीच्या खोर्‍यातील हरिश्चंद्रगडाचा परिसर तुफान पावसाचे आगार समजले जाते. विस्तीर्ण परिसर असलेल्या या भागात पडणार्‍या जलधारा छोट्या-मोठ्या ओहोळांमधून मुळानदीत जावून मिसळतात, त्यामुळे जुलैच्या महिन्यात मुळा नदी हमखास दुथडी भरुन वाहत असते. मुळा खोर्‍यातील 192 दश लक्ष घनफूट क्षमतेच्या आंबित आंबित पाठोपाठ 600 दशलक्ष घनफूट क्षमतेचा पिंपळगाव खांड प्रकल्पही यापूर्वीच भरल्याने मुळा धरणात संथगतीने पाण्याची आवक सुरु आहे. मात्र मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्यानंतर पावसाला पुन्हा जोरच चढला नसल्याने या भागालाही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र गेल्या चोवीस तासांपासून हरिश्चंद्रगडाच्या माथ्यावर संततधार सुरु असल्याने मुळेच्या प्रवाहात भर पडली असून मोठ्या प्रतीक्षेनंतर कोतुळनजीकच्या मुळापात्रातून 1 हजार 158 क्युसेक्सचा प्रवाह वाहू लागला आहे.

मागील चोवीस तासांत भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील घाटघर येथे 37 मिलीमीटर, रतनवाडी 22 मिलीमीटर, पांजरे 14 मिलीमीटर, भंडारदरा 11 मिलीमीटर, वाकी 06 मिलीमीटर, कोतूळ 01 मिलीमीटर, लाभक्षेत्रातील आश्वी 07 मिलीमीटर, लोणी 09 मिलीमीटर व श्रीरामपूर येथे 12 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासांत भंडारदरा धरणात अवघे 09 दशलक्ष घनफूट पाणी दाखल होवून पाणीसाठा 4 हजार 640 दशलक्ष घनफूट झाला आहे. निळवंडे धरणात 63 दशलक्ष घनफूट पाणी येवून साठा 1 हजार 79 दशलक्ष घनफूट, मुळा धरणात 29 दशलक्ष घनफूट पाणी येवून साठा 9 हजार 390 दशलक्ष घनफूट व आढळा धरणात 04 दशलक्ष घनफूट पाणी दाखल होवून साठा 463 दशलक्ष घनफूट झाला आहे. सध्या भंडारदरा धरणातून 826 क्युसेक्सने निळवंडे धरणात पाणी सोडले जात असून निळवंड्यातून प्रवरा पात्रात सोडण्यात आलेले आवर्तन मंगळवारी बंद करण्यात आले आहे.

जिल्ह्यातून जिल्ह्यातच वाहणार्‍या मुळा आणि प्रवरा या दोन मोठ्या नद्यांच्या खोर्‍यात जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यात पावसाचा अक्षरशः झंझावात सुरु असतो. विशेष म्हणजे यावर्षी पाणलोट क्षेत्रात पावसाने वेळेवर हजेरीही लावली होती. मात्र त्यानंतर त्याने दीर्घकाळ पाठ दाखवल्याने आदिवासी बांधवांच्या चिंता वाढल्या आहेत. एकीकडे पाणलोटाला मोठ्या पावसाची प्रतीक्षा असताना दुसरीकडे लाभक्षेत्रात सर्वदूर पाऊस झाल्याने एका डोळ्यात हसू तर दुसर्‍या डोळ्यात अश्रू अशा विचित्र स्थिती सध्या या दोन्ही नद्यांच्या लाभक्षेत्रात निर्माण झाली आहे.

Visits: 6 Today: 1 Total: 30501

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *