आ.खताळ यांनी वेधले विविध प्रश्नांवर ना.अमित शाह यांचे लक्ष

नायक वृत्तसेवा, लोणी
लोणी येथे रविवारी पार पडलेल्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह उपस्थित होते. या भेटीदरम्यान आ.अमोल खताळ यांनी संगमनेर तालुका तसेच अहिल्यानगर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन थेट अमित शाह यांना सादर करत यांचे लक्ष वेधले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत हे निवेदन देत, संगमनेर तालुका आणि जिल्ह्याच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा मुद्दा मांडला.

या निवेदनात नाशिक–पुणे रेल्वे मार्ग संगमनेर मार्गे नेण्याची, नाशिक–पुणे राष्ट्रीय महामार्ग (एनएच-६०) सहा पदरी करण्याची, राज्यातील पहिले सहकारी तत्वावरील विद्यापीठ अहिल्यानगर जिल्ह्यात स्थापन करण्याची, संगमनेर तालुक्याला कृषी हब म्हणून विकसित करण्याची, तसेच संगमनेरमध्ये केंद्र सरकारच्या अधिन कामगार रुग्णालय स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. आ. खताळ यांनी यावेळी सांगितले की, या सर्व मागण्या पूर्ण झाल्यास संगमनेर तालुका आणि संपूर्ण जिल्ह्याचा विकास वेगाने होईल. संगमनेर हे कृषी, व्यापार, शिक्षण आणि आरोग्य या सर्वच क्षेत्रांमध्ये प्रगत होत असले तरी केंद्र सरकारच्या सहकार्याने या भागाचा सर्वांगीण विकास साधता येईल, असे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आ. अमोल खताळ यांच्याकडून निवेदन स्विकारत सर्व मागण्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून विचार केला जाईल आणि आवश्यक ती पुढील कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.

या भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, आ. शिवाजी कर्डिले,आ. काशिनाथ दाते, आ.विठ्ठल लंघे, आ.मोनिका राजळे,आ. संग्राम जगताप, आ.आशुतोष काळे,आ. विक्रम पाचपुते आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.या भेटीमुळे संगमनेर तालुका आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासाच्या दिशेने नवा टप्पा सुरू झाल्याचे मानले जात आहे. स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांकडून आ. अमोल खताळ यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक होत आहे.

Visits: 26 Today: 1 Total: 1108396
