श्रीरामपूरातील लॉकडाऊन टाळण्यासाठी माजी आमदार सरसावले

श्रीरामपूरातील लॉकडाऊन टाळण्यासाठी माजी आमदार सरसावले
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून दररोज कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी काही तालुक्यांमध्ये पुन्हा लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. मात्र जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात लॉकडाऊन केला जाऊ नये यासाठी माजी आमदार पुढे सरसावले आहेत.


कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी बुधवारी सर्वपक्षीय बैठक घेत रविवारपासून (ता.13) पुढील आठ दिवस शहरात लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला. परंतु सदर निर्णयानंतर माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी नुकताच लॉकडाउनला विरोध दर्शवत व्यापार्‍यांना दुकाने खुली ठेवण्याचे आवाहन केले. या संदर्भात मुरकुटे म्हणाले, शहरात लॉकडाऊन करुन काही फायदा होणार नाही. माझ्या कुटुंबातील पाच व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला होता. जे नागरिक नियम पाळणार नाहीत. त्यांना कोरोनाचा संर्सग होण्याची दाट शक्यता आहे. आता पोलीस प्रशासनही कंटाळले आहे. आत्तापर्यंत नागरीकांना कोरोना संसर्गाचे गांभीर्य कळाले आहे. त्यामुळे शहर लॉकडाऊन करुन फारसा उपयोग होणार नाही. ज्यांना विनाकारण फिरायचे आहे, ते फिरणार आहे. सरकारकडून सर्व सेवा सुविधा खुल्या केल्या जात असताना श्रीरामपूरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेणारे हे कोण? असा सवालही मुरकुटे यांनी उपस्थित केला आहे. लॉकडाऊन करुन गरिबांनी भीक मागायची का, त्यापेक्षा नियमांचे पालन करुन गरिबांना पोट भरु द्या, असे आवाहन करुन लॉकडाऊनला मुरकुटे यांनी विरोध दर्शविला आहे.

Visits: 108 Today: 1 Total: 1578576

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *