रांजणखोल येथे पती-पत्नीस मारहाण

नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील रांजणखोल येथील एका 32 वर्षीय महिलेस शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी व लाकडी वस्तूने मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी (ता.20) सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास नीलेश विजय जाधव यांच्या घराशेजारी राहणारा आबासाहेब ढोकचौळे याने दारू पिऊन येऊन काहीही कारण नसताना जाधव यांची पत्नी व त्यांना शिवीगाळ केली. त्यावेळी ते दोघेही त्यांना शिवीगाळ करू नका, म्हणून सांगितले. त्यानंतरही वाद होऊ नये म्हणून ते गावात निघून गेले. परंतु, थोड्या वेळाने घरी भांडणे झाली असल्याचे फोनवरून समजले. घरी गेले असता आबासाहेब ढोकचौळे व गणेश ढोकचौळे त्यांना म्हणाला की, ‘तुझ्या घरासमोरील गटार माझ्या हद्दीत आहे, ती जागा तुम्ही वापरू नका’. तसेच आम्ही खूप जणांना गावाच्या बाहेर काढले आहे तुम्हालाही काढू, अशी धमकी दिली. तसेच पत्नी, आई, वडिलांना शिवीगाळ केली. शिवीगाळ का करता, असे विचारल्यावर दोघांना सहाजणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि आजीस शिवीगाळ केली. याप्रकरणी नीलेश जाधव यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आबासाहेब लिंबाजी ढोकचौळे, गणेश आबासाहेब ढोकचौळे, महेश दत्तात्रय ढोकचौळे, रोहित दत्तात्रय ढोकचौळे, बाबासाहेब हरिश्चंद्र ढोकचौळे, लीला आबासाहेब ढोकचौळे यांचेविरुद्ध गु.र.नं.395/2021 भादंवि कलम 143, 147, 149, 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक साईनाथ हे करत आहेत.

Visits: 154 Today: 1 Total: 1954648

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *