संगमनेर पालिकेची ‘माझी वसुंधरा अभियानां’तर्गत सायकल फेरी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्य शासनाच्या ‘माझी वसुंधरा अभियानां’तर्गत संगमनेर पालिकेच्यावतीने मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली आज (गुरुवार ता.21) सायकल फेरी काढून प्रबोधन करण्यात आले.
सकाळी सात वाजता पालिकेच्या कार्यालयापासून फेरीला प्रारंभ होऊन पालिका प्रांगण, मुख्य रस्ता, गवंडीपुरा मस्जिद, जुना पुणे-नाशिक महामार्ग, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बसस्थानक, वीज उपकेंद्र, अकोले बाह्यवळण रस्ता, अकोले नाका आणि पालिका प्रांगणात येऊन सांगता करण्यात आली. यावेळी जल, वायू व ध्वनि प्रदूषण टाळण्यासाठी आणि शाश्वत विकास करण्यासाठी याद्वारे प्रबोधन करण्यात आले. वायू प्रदूषण टाळण्यासाठी पालिका अधिकारी व कर्मचार्यांसह सर्वांनी एक दिवस सायकल चालवून या अभियानास प्रोत्साहन द्यावे, झाडू लावून त्याचे संगोपन करावे, रेन हार्वेस्टिंग करावे, कचरा घंटागाडीतच टाकावा, स्वच्छता राखावी असे आवाहनही त्यांनी केले. या फेरीमध्ये पालिका अधिकारी, कर्मचारी, कुटुंबीय व शहरवासिय सहभागी झाले होते. त्यांनी प्रबोधनात्मक घोषणा दिल्याने शहर दुमदुमून गेले होते.