निळवंडेतून 1200 क्युसेक्सने पिण्याच्या पाण्याचे आवर्तन

नायक वृत्तसेवा, अकोले
यावर्षी वरुणराजाने धुवाँधार बरसात केल्याने तालुक्यातील सर्व छोटी-मोठी धरणे ओसंडली होती. त्यामुळे लाभधारकांत आनंदाचे वातावरण आहे. जमिनीतील पाण्याची पातळीही वाढल्याने शेतीसाठी आवश्यक स्त्रोत काठोकाठ भरल्याने रब्बी हंगाम व्यवस्थित पार पडेल, त्यादृष्टीने शेतकर्यांनी हंगामाचे नियोजन केले आहे. तत्पूर्वी भंडारदरा लाभक्षेत्रातील गावांसाठी पिण्याचे पाण्याचे बिगर सिंचन आवर्तन आज शुक्रवार (ता.4) सकाळी साडेसहा वाजता निळवंडे धरणातून 1200 क्युसेक्स विसर्गाने सोडण्यात आले असल्याची माहिती शाखा अभियंता अभिजीत देशमुख यांनी दिली आहे.
![]()
अकोले तालुक्यातील भंडारदरा, निळवंडे, वाकी, पिंपळगाव खांड, आढळा, पाडोशी अशी सर्व छोटी-मोठी धरणे यंदा तुडूंब भरली आहेत. यामुळे लाभक्षेत्रातील शेतकर्यांना गरजेनुसार आवर्तन सोडण्याच्या दृष्टीने जलसंपदा विभागाने आत्तापासूनच नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. रब्बी सिंचन आवर्तन सोडण्यापूर्वी आज निळवंडे धरणातून 1200 क्युसेक्स विसर्गाने लाभधारकांसाठी पिण्याच्या पाण्याचे बिगर सिंचन आवर्तन सोडले आहे. त्यावेळी निळवंडे धरणाची पाणीपातळी 648 मीटर व पाणीसाठा 8285 दलघफूट असल्याची माहितीही देशमुख यांनी दिली आहे.

