मंदिराचे पावित्र्य टिकविण्याच्या भावनेतूनच ‘तो’ निर्णय ः मुश्रीफ ‘कोरोनाचे संकट समूळ नष्ट होऊ दे’, साईचरणी केली प्रार्थना

नायक वृत्तसेवा, शिर्डी
साई संस्थानने भक्तांच्या पोषाखाबाबत घेतलेल्या निर्णयावर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. या निर्णयाबाबत गैरसमज न करता केवळ पावित्र्य टिकावे, या भावनेतून संस्थांनने हे केलेले आवाहन आहे, असे त्यांनी स्पष्ट करतानाच या आवाहनाचे पालन करावे, असेही त्यांनी आवर्जुन सांगितले. पालकमंत्री मुश्रीफ यांनी शिर्डी येथे आज (गुरुवार ता.3) श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात दर्शनासाठी येणार्या भाविकांनी भारतीय पोषाखात यावे, अशी विनंतीवजा सूचना साईबाबा संस्थानने भाविकांना केली आहे. यावरून मात्र चांगलाच वाद पेटला आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी तरी थेट हा बोर्ड संस्थानने काढला नाही तर आम्ही येऊ काढू, असा इशाराच दिला आहे. या वादात हिंदू जनजागृती समितीने उडी घेतली आहे. समितीने या संदर्भात एक पत्रकच प्रसिद्ध केले होते. शिर्डी येथील साई संस्थानप्रमाणेच सर्वच मंदिरात भारतीय संस्कृतीनुसार पोषाख लागू करावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली होती. त्यातच पालकमंत्री मुश्रीफ यांनीही यावर आपले मत व्यक्त केले आहे.

याबाबत बोलताना पालकमंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, शिर्डी संस्थानने भक्तांच्या पोषाखाबाबत जाहीर आवाहन केले आहे. याबाबत संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी मला सांगितले आहे की, भारतीय संस्कृतीत चांगला पेहराव घालून आपण दर्शनासाठी आलो तर कोणाची भावना दुखावणार नाही. या भावनेने आम्ही हा बोर्ड लिहिला आहे. कोणालाही याबाबत सक्ती केली नाही. अर्थात, प्रत्येकाला जीवन जगण्याचा अधिकार आहे. मात्र एवढीच विनंती आहे की, गैरसमज न करता पावित्र्य टिकावे या भावनेने संस्थानाने केलेल्या आवाहनाचे पालन करावे. शिर्डीत येणार्या भक्तांकडून संस्थानने घेतलेला निर्णय योग्य की आयोग्य याबाबतचा अभिप्राय घेतला जात आहे. त्यामध्ये सर्वांनी चांगला निर्णय झाल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या निर्णयाची कोणाला सक्ती नाही. तो ऐच्छिक आहे. पण त्याचे पालन करावे, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

कोरोनाचे संकट समूळ नष्ट होऊ दे…!
जगामध्ये आलेले कोरोनाचे संकट समूळ नष्ट होऊ दे, अशी साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली असल्याचेही पालकमंत्री हसन मुश्रीफ यावेळी म्हणाले. पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच साईबाबांचे दर्शन घेण्याची संधी मिळाली. हे मी माझे भाग्य समजतो. काही दिवसांपूर्वी येथे आलो होतो. परंतु मंदिर उघडण्यास बंदी असल्याने मला दर्शन घेता आले नाही.

