‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम स्तुत्य : आ.अमोल खताळ

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास
थांबविण्यासाठी नाणीजधामचे जगद्गुगुरु नरेंद्राचार्य महाराज यांनी सुरू केलेला ‘एक पेड माँ के नाम’ हा अभिनव उपक्रम निश्चितच पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी उपयोगी पडेल असा विश्वास आ. अमोल खताळ यांनी व्यक्त केला.

जगद्गुरू स्वामी रामानंदाचार्य उर्फ नरेंद्राचार्य महाराज यांचा रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीजधामला २१ ऑक्टोबर जन्मसोहळा होत आहे. त्या निमित्त उत्तर महाराष्ट्रातून हजारो भाविक भक्तांचा सहभाग असलेली वसुंधरा पायी दिंडीचे २९ सप्टेंबर रोजी उत्तर महाराष्ट्र नाशिक उपपीठ येथून प्रस्थान झाले आहे. ही दिंडी उत्तर आहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे आली असता आ. अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांनी या दिंडीचे संगमनेर शहरात उत्स्फूर्त स्वागत केले.तसेच चंदनापुरी येथील सिंधू लॉन्स येथे आ. अमोल खताळ यांनी स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या सिद्धपादुकांचे दर्शन घेतले व त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील भाविकभक्तांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.या प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ राहणे, दिंडी प्रशासन प्रमुख सुभाष सानप,उत्तर अहिल्यानगर जिल्हा निरीक्षक दादासाहेब मते, उत्तर अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सयाजी भडांगे, तालुकाध्यक्ष प्रकाश बेलापूरकर, राजशिष्टाचारप्रमुख व्यंकटेश बप्पा यांच्यासह अनेक भाविकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ.खताळ पुढे म्हणाले, ‘एक पेड मा के नाम’ ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पुढे आली आहे आणि त्या संकल्पनेच्या आधारावर स्वामी नरेंद्राचार्य महाराज भक्तगणांनी पर्यावरणाविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी वसुंधरा पायी दिंडी हा उपक्रम सुरू केला आहे. तो एकदम स्तुत्य उपक्रम आहे. स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा तुमच्या, आमच्यावर कृपाशीर्वाद आहे.त्यांनी व त्यांच्याभाविक भक्तांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी काम सुरू केले आहे. त्याचेच फळ विधानसभा निवडणुकीत मला मिळाले आहे. आणि माझ्या सारख्या एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला या तालुक्याचे लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी या संप्रदायातील भाविक भक्तांमुळे मिळाली आहे. या वृक्षदिंडीमध्ये लहानांपासून ज्येष्ठापर्यत आणि महिलांपासून पुरुषांपर्यंत सर्वच जण भक्तिमय वातावरणात सहभागी झाले आहे. मात्र या दिंडीमध्ये महिलांचा सहभाग जास्त प्रमाणात दिसून येत आहे. नारीशक्तीच्या माध्यमातून देशाची व धर्माची यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे आ. खताळ यांनी सांगितले

नाशिक उपपिठाहुन नाणीजधाम येथे स्वामी नरेंद्रचार्य महाराज जन्म सोहळा निमित्त जात असणाऱ्या वसुंधरा पायी दिंडीचे संगमनेर येथील मालपाणी लॉन्स येथे आ. अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांनी स्वागत केले. त्यांनी झाडे लावा… झाडे जगवा… पर्यावरणाचा ऱ्हास थांबवा हा संदेश या वृक्षदिंडीच्या माध्यमातून पोहोचून पर्यावरण जागृती करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. तो निश्चितच पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी उपयोगी पडेल असा विश्वास व्यक्त केला.

Visits: 130 Today: 1 Total: 1413883
