शासकीय मागासवर्गीय वसतीगृहाला सरकारची मंजुरी
आ.अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्याच्या ग्रामीण भागातून महाविद्यालयीन शिक्षणासाठी संगमनेरला येणाऱ्या मागासवर्गीय समाजातील मुलामुलींना शासकीय वसतीगृह नसल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या, म्हणून संगमनेरला नवीन शासकीय वसतीगृह सुरू करावे अशी मागणी आ. अमोल खताळ यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांच्याकडे केली होती. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून राज्य शासनाने संगमनेरला नवीन मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह सुरू करण्यास मंजुरी दिली.

तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिक्षणासाठी संगमनेरला येत असतात मात्र त्यांच्या निवास आणि भोजनाच्या सुविधांचा अभाव असल्यामुळे त्यांचे शिक्षण अर्धवट राहते. किंवा त्यांना शहराबाहेर महागड्या खाजगी वसतीगृहांचा पर्याय स्वीकारावा लागतो. तसेच वसतीगृह नसल्यामुळे अनेक गरीब व मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. जर नवीन शासकीय वसतीगृह सुरू झाले तर त्यांची निवास, भोजन व अभ्यास करण्याची सोय होऊ शकते आणि त्यांची शैक्षणिक प्रगती वेगाने होऊन त्यांचे सामाजिक आणि आर्थिक सबलीकरण होईल तसेच सामाजिक व शैक्षणिक संधी मिळेल अशी मागणी आ. अमोल खताळ यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्याकडे केली होती. त्यांनी तात्काळ या मागणीची दखल घेऊन मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी नवीन वसतीगृह सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना याचा निश्चित फायदा होणार आहे.

तालुक्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या नवीन शासकीय वसतीगृहासाठी मंजुरी देऊन हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याला बळकटी मिळाली आहे. यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानतो. विद्यार्थ्यांना मिळालेल्या या सुविधेमुळे तालुक्यातील सामाजिक व शैक्षणिक परिवर्तनाला नवी गती मिळणार असल्याचा विश्वास आ. खताळ यांनी व्यक्त केला.

Visits: 105 Today: 1 Total: 1421351
