गुरुवारपासून चार दिवस संगमनेर फेस्टिव्हलचे आयोजन! संगमनेरकरांसाठी सांस्कृतिक मेजवानी; एकाहून एक सरस नाट्यकृतींचे सादरीकरण

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
येत्या गुरुवारपासून (ता.२८) रविवारपर्यंत चार दिवस आयोजित करण्यात आलेल्या ‘संगमनेर फेस्टिवल’च्या माध्यमातून संगमनेरकरांना मनोरंजनाची भरगच्च मेजवानी मिळणार आहे. सर्व संगमनेरकरांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संगमनेर फेस्टिवलचे प्रणेते, राजस्थान युवक मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
याबाबत पत्रकामध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये संगमनेरचा ‘संस्कृतिक मानबिंदू’ म्हणून लौकिक मिळवणार्‍या संगमनेर फेस्टिवलच्या आयोजनाचे हे सतरावे तर राजस्थान युवक मंडळाच्या स्थापनेचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. गुरुवारी २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध नाट्य व चित्रपट अभिनेते संदीप पाठक ‘वर्‍हाड निघालंय लंडनला’ हा प्रचंड विनोदी लोकप्रिय एकपात्री प्रयोग सादर करणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे. शुक्रवार दि.२९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता देश-विदेशात प्रचंड गाजलेला आणि मराठी मनात घर केलेला संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांचा अविस्मरणीय कार्यक्रम ‘आयुष्यावर बोलू काही’ सादर होणार आहे.
शनिवार  दि.३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता तुफान विनोदी नाटक ‘आमने सामने’ सादर होणार आहे. लोकप्रिय अभिनेत्री लीना भागवत आणि मंगेश कदम यांच्या या नाटकाने लोकप्रियतेचे शिखर गाठले असून पुरस्कारांची हॅट्रिक केलेली आहे. रविवार दि.३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता महाराष्ट्राची हास्य जत्रा या तुफान विनोदी कार्यक्रमातील कलाकार प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव यांच्यासह यशस्वी कलाकारांच्या संच पोट धरून हसायला लावणारे लोकप्रिय नाटक सादर करणार आहेत. विजय नागरी सहकारी पतसंस्था, स्वदेश प्रॉपर्टीज, संगमनेर मर्चंट्स बँक, शारदा नागरी सहकारी पतसंस्था यांनी कार्यक्रमांचे प्रमुख प्रायोजकत्त्व स्वीकारले आहे.
दि.२९,३०, आणि ३१ ऑगस्ट रोजी होणार्‍या कार्यक्रमांच्या पुढील खुर्च्यांसाठी देणगी प्रवेशिका आवश्यक असून उर्वरित मागील खुर्च्यांसाठी प्रवेश विनामूल्य असल्याचा खुलासा प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला आहे. वरील सर्व कार्यक्रम मालपाणी लॉन्सच्या उत्सव सभागृहात होणार आहेत. मंडळाचे कार्याध्यक्ष सुमित अट्टल, उपाध्यक्ष सागर मणियार, सचिव कल्पेश मर्दा, खजिनदार प्रतीक पोफळे, सहसचिव कृष्णा आसावा, सहखजिनदार वेणूगोपाल कलंत्री यांच्यासह कार्यकारणी सदस्य गिरीश मालपाणी, मनीष मणियार, नितीन लाहोटी, ओंकार बिहाणी, रोहित मणियार, सचिन पलोड , राजेश आर. मालपाणी, कल्याण कासट, सम्राट भंडारी, सुदर्शन नावंदर, व्यंकटेश लाहोटी, उमेश कासट, ओंकार इंदाणी, नंदन कासट, पवन करवा, चेतन नावंदर, अक्षय कलंत्री, अमित चांडक, निलेश एन.जाजू, आनंद लाहोटी, कौस्तुभ झंवर, शुभम असावा, महेश पडतानी, प्रथम खटोड, प्रणित मणियार आदी नियोजनाची जबाबदारी सांभाळत आहेत.
Visits: 197 Today: 1 Total: 1917246

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *