संगमनेरच्या प्रवरा पात्रात अकोल्याचे तिघे बुडाले! एकाला वाचविण्यात यश; दोघांचेही मृतदेह सापडले..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
वाळू तस्करांच्या बेलगाम हैदोसामुळे दरवर्षी उन्हाळी आवर्तनात निष्पापांचा जीव जाण्याच्या घटना यंदाही कायम असून आज दुपारी साडेचारच्या सुमारास संगमनेरच्या गंगामाई घाटाजवळ तिघेे बुडाल्याची दुर्दैवी घटना समोर आली. सुदैवाने त्यावेळी आसपास काहीजण पोहत असल्याने त्यांनी बुडाणार्‍या तिघांमधील एकाला वाचविले, मात्र उर्वरीत दोघेही प्रवाहात वाहून गेले. त्यातील एकाचा मृतदेह तासाभराने तर दुसर्‍याचा पावणे सातच्या सुमारास हाती लागला. पाण्यात बुडून मृत्यू झालेले दोघेही अठरा वर्षीय विद्यार्थी असून अकोल्याचे रहिवाशी आहेत. या घटनेने संगमनेरसह अकोले शहरात शोककळा पसरली आहे.

याबाबत हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार अकोल्यातील नवलेवाडी येथे राहणारा नीलेश माधव आस्वले (वय 18), अमोल उत्तम घाणे (वय 18, रा.शिवाजीनगर, अकोले) व युवराज नवनाथ धुमाळ (वय 18, रा.धुमाळवाडी, अकोले) हे तिघेही आज (ता.05) महाविद्यालयीन कामासाठी संगमनेरात आले होते. कामकाज आटोपल्यानंतर हे तिघे घुलेवाडीतील त्यांचे मित्र रुतुराज मच्छिंद्र थोरात (वय 19) व हर्षल युवराज भुतांबरे (वय 18) यांच्यासह दुपारी सव्वाचारच्या सुमारास आंघोळीसाठी संगमनेरच्या गंगामाई घाटावर आले. या वेळेस घाटांवर पोहोणणार्‍यांची संख्याही तुरळक असते.

त्याचवेळी हे पाचहीजण आंघोळीसाठी पात्रात उतरले. मात्र गेल्याकाही वर्षात झालेल्या बेसुमार वाळू लुटीने संगमनेरचे नदीपात्र अतिशय धोकादायक आणि जीवघेणे ठरले आहे. शहरालगतचे संपूर्ण नदीपात्रच असमांतर असल्याने क्षणात ठाव तर क्षणात दहा ते बारा फूटांचा खड्डा अशी पात्राची अवस्था आहे. त्यामुळे पोहता पोहता अकोल्याचे दोघे मधल्या धारेपर्यंत गेल्याने पाण्याच्या प्रवाहाने त्यांना मध्यात ओढले. नेमक्या त्याच बाजूला तस्करांनी करामत केलेली असल्याने दोघेही गटांगळ्या खाऊ लागले, वाचवाऽ.. वाचवाऽ.. अशी त्यांची आर्त आरोळी ऐकून जवळच असलेला त्यांचा मित्र युवराज त्यांना वाचवण्यासाठी गेला. मात्र तो पर्यंत त्यांचा नोकातोंडात पाणी शिरल्याने नीलेश आस्वले व अमोल घाणे हे दोघेही पाण्याखाली गेले.

दुर्दैवाने यावेळी नदीवर पोहोणार्‍यांची फारशी वर्दळ नसल्याने बुडालेल्या नीलेश माधव आस्वले व अमोल उत्तम घाणे यांना वेळीच मदत मिळाली नाही. सदरचे वृत्त समजताच जाणता राजा प्रतिष्ठानचे मूकेश नरवडे व रोहित परदेशी तसेच शिवछत्रपती फायर सर्व्हिसेसच्या नवनाथ सिनारे यांनी गंगामाई घाटावर जावून बुडालेल्या दोघांचाही शोध सुरु केला. त्यातील नीलेश आस्वले या नवतरुणाचा मृतदेह तासाभरानंतर तर अमोल घाणेचा मृतदेह काही क्षणापूर्वी पावणेसात वाजता हाती लागला आहे. ज्यावेळी मृत नीलेशची आई गंगामाई घाटावर पोहोचली, त्याचवेळी त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला जात होता, ते दृष्य पाहून त्या मातेने फोडलेला हंबरडा प्रवरामाईचा संपूर्ण परिसर सून्न करणारा होता.

मानवी कृत्यांनी कधीकाळी साक्षात अमृत वाहील्याने अमृतवाहिनी झालेल्या प्रवरेचे अक्षरशः वाळवंट करुन टाकले आहे. राजकीय आशीर्वादाने पोसलेल्या असंख्य वाळू तस्करांनी तर संपूर्ण गावाचा विरोध डावलून बिनधास्तपणे भर पाण्यातून घाट आणि त्या भोवतीचा परिसर अक्षरशः ओरबाडल्याने गेल्या काही वर्षात दरवर्षी उन्हाळी आवर्तनात निष्पापांचे जीव जात आहेत. आज बळी गेलेले दोघेही देशाचे भविष्य होते, ज्यांचे आयुष्य नशेखोरीत डूंबलेल्या आणि रात्रभर वाहनाचे टायर पाण्यात टाकून वाळू उपसणार्‍या आणि ज्यांचा देशाला काहीच उपयोग नाही अशांनी संपवले आहे.

गंगामाई घाट परिसरातून वाळू उपसतांना यापूर्वी कारवाई झालेल्या तस्करांचा शोध घेवून पोलिसांनी खरेतर त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन राज्यात आदर्श निर्माण करायला हवा. सध्याचे दोन्ही अधिकारी जरी नवीन असतील मात्र बदली होवूनही पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसलेल्या आणि गावात ‘कलेक्टर’ नावाने कुपरिचित असलेले दोघे मात्र अजूनही इनामेइतबारे सेवा बजावित आहेत. त्यांच्याच आशीर्वादाने गंगामाई घाटावरील वाळूचोरी फोफावली होती. कठोर प्रशासक म्हणून संगमनेरात पाऊल ठेवणारे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे आज बुडालेल्या दोघा नवतरुणांचा मृत्यू किती गांभीर्याने घेतात हे आता महत्वाचे आहे.

त्या मातेच्या हंबरड्याने आसमंतही गहिवरला..
बुडीताच्या घटनेनंतर त्यांचा शोध सुरु असतांना साधारण तासाभराने नीलेश आस्वले याचे आई-वडील अकोल्यातून थेट गंगामाई घाटावर पोहोचले. दुर्दैव असे की घाटावरील पायर्‍या उतरत असतांनाच नीलेशचा मृतदेह हाती लागला. बचावकार्य करणारे तरुण तो मृतदेह बाहेर घेवून घाटाजवळ पोहोचले त्यावेळी त्याची आई पहिल्या पायरीवरुन ते दृष्य पाहत होती. आपल्या लाडक्या मुलाचा मृतदेह डोळ्यासमोर पाहून त्या माऊलीने एकच हंबरडा फोडला. त्या वेदनेने झाडाझाडांवर बसलेली हजारों पाखरेंही शहारुन फडफडून उडाली, त्यावेळी आसमंतालाही गहीवर यावा असे वातावरण निर्माण झाले होते.

Visits: 8 Today: 2 Total: 23121

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *