ग्लोबल कॉन्फरन्समुळे पुरोगामी विचारांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळाले ः थोरात
ग्लोबल कॉन्फरन्समुळे पुरोगामी विचारांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळाले ः थोरात
जयहिंद लोकचळवळीच्यावतीने विविध विषयांवर आंतरराष्ट्रीय परिसंवाद
नायक वृत्तसेवा, संगमनेर
आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून युवकांना बरोबर घेवून त्यांना सुसंस्कृतीत करत त्यांना कला, क्रीडा या क्षेत्रासह विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन व संधी निर्माण करुन दिली. या ग्लोबल कॉन्फरन्समध्ये अनेक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी सहभाग घेवून विविध विषयांवर भाष्य केले असून, याद्वारे पुरोगामी व भारतीय विचारांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ निर्माण झाले असल्याचे गौरवौद्गार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.

जयहिंद लोकचळवळीच्यावतीने आयोजित लोकशाही या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिसंवादात ते बोलत होते. यामध्ये कॉम्रेड कन्हैय्या कुमार, ज्येष्ठ विचारवंत संजय आवटे, इंग्लंडमधून कार्लस टोर्नर, प्रसिद्ध कायदे तज्ज्ञ अॅड.असीम सरोदे, जर्मनीच्या मायकल क्राऊली, अमेरिकेचे जेरमी क्लेम, हिरालाल पगडाल आदिंनी सहभाग घेतला. यावेळी अमृतवाहिनीच्या द्रोणागिरीतील मुख्य व्यासपीठावर जयहिंदचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, उत्कर्षा रुपवते, समन्वयक संदीप खताळ, उत्तम जगधने, अशोक खैरनार, डॉ.सूरज गवांदे, किशोर गोरे, प्रदीप नेहे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना मंत्री थोरात म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधींचा विचार घेऊन मागील 20 वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यात जयहिंद लोकचळवळ काम करत आहे. राज्यघटनेवर विश्वास असणार्या या पुरोगामी विचाराच्या चळवळीने सुसंस्कृत तरुण उभे केले आहे. कला, क्रीडा यासह तरुणांना स्पर्धा परीक्षा व विविध क्षेत्रांसाठी मार्गदर्शन करुन संधी निर्माण करुन दिली. त्यांच्या माध्यमातून सुदृढ समाज निर्मितीसाठी काम सुरू आहे. तीन दिवसीय ग्लोबल कॉन्फरन्समध्ये विविध आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी शेती, जागतिक शांतता, महिला सबलीकरण, लोकशाही यावरील चर्चेत सहभाग घेतला. हे सातत्य यापुढेही कायम राखले जाणार असल्याचे शेवटी थोरात म्हणाले. प्रास्ताविक जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी केले. सूत्रसंचालन उत्कर्षा रूपवते व अॅड.गवांदे यांनी केले तर अशोक खैरनार व संदीप खताळ यांनी आभार मानले.

