शेतकर्‍यांच्या वीजप्रश्नावर राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक संपूर्ण वीजबिल माफीसह विविध मागण्यांचे दिले निवेदन


नायक वृत्तसेवा, राहुरी
शेतकर्‍यांच्या वीजप्रश्नावर सत्ताधारी भाजपचा मित्रपक्ष राष्ट्रीय समाज पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकर्‍यांना संपूर्ण वीजबिल माफीसह विविध मागण्यांसाठी तहसीलदार, प्रांताधिकारी व महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला जाईल, असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षातर्फे देण्यात आला आहे.

राहुरी येथे सोमवारी (ता.13) राष्ट्रीय समाज पक्षातर्फे तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र सरकारने मध्य प्रदेश सरकारप्रमाणे शेतकर्‍यांचे वीजबिल भरावे. थकीत वीजबिल वसुलीसाठी शेतीचा वीज पुरवठा खंडित करू नये. शेतीसाठी दिवसा बारा तास वीज पुरवठा करावा. शेतकर्‍यांचे संपूर्ण थकीत वीजबिल माफ करावे. शेतीसाठी मोफत वीज द्यावी. शेतकर्‍यांचा बंद केलेला वीज पुरवठा तत्काळ सुरू करावा, अन्यथा प्रशासन व महावितरण कार्यालय मोर्चा काढला जाईल.

या निवेदनावर राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष (उत्तर) शरद बाचकर, जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे, तालुकाध्यक्ष शिवाजी सरक, उमेश बाचकर, बिलाल शेख, करण माळी, बापूसाहेब विटनोर, पोपट विटनोर, अण्णासाहेब सरोदे, अण्णासाहेब कोळेकर, आप्पासाहेब विटनोर, विजय कोळसे, भारत हापसे, अभिमन्यू बाचकर, शिवाजी कोळसे यांच्या सह्या आहेत.

Visits: 120 Today: 1 Total: 1421333

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *