अखंड हरिनाम सप्ताहासाठी मुस्लीम बांधवांकडून मंडप! बोटा येथे घडले हिंदू-मुस्लीम ऐक्याचे अनोखे दर्शन

नायक वृत्तसेवा, घारगाव
सध्या अनेक ठिकाणी धार्मिक स्थळांवरून वाद सुरू आहेत. त्यावरून दावे प्रतिदावे केले जात आहेत. अहमदनगर जिल्ह्यातही काही ठिकाणी या कारणांवरून वातावरण गढूळ झाले आहे. अशा परिस्थितीत संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील बोटा येथे दोन समाजातील एकोप्याचे अनोखे दर्शन पाहायला मिळाले. गावकर्यांनी आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी गावातील मुस्लीम बांधवांनी मंडपासाठी योगदान देत यामध्ये आपलाही सहभाग नोंदवला आहे.

बोटा येथे महाशिवरात्रीनिमित्त कच नदीच्या काठी श्री कचेश्वर मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कच नदीच्या काठी श्री कचेश्वर मंदिरात 12 ते 19 फेब्रुवारीपर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताह काळात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच रोज सायंकाळी बोटा, केळेवाडी, कुरकुटवाडी, तळपेवाडी, माळवाडी, हनुमाननगर ग्रामस्थांच्या पुढाकाराने कीर्तनानंतर महाप्रसादाचे नियोजन करण्यात आहे.

गावातील सर्वधर्माच्या लोकांनी एकत्र येत महाप्रसादाचा दिवस वाटून घेतला आहे. यंदा सप्ताहाच्या आयोजनातही मुस्लीम बांधवांनी सहभाग घेतला आहे. सर्व मुस्लीम बांधवांनी सप्ताह काळात उभारण्यात येणार्या मंडपाच्या खर्चाची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. बोटा गाव विधायक कामांमध्ये नेहमीच अग्रेसर असते. गेल्या अनेक वर्षांपासून गावच्या अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा कायम आहे. या सप्ताहात सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होतात. मुस्लीम बांधवांनी मंडप खर्चाची जबाबदारी घेत धार्मिक विद्वेषाला गावकरी कधीच बळी पडणार नाही, असा संदेशच देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी मुस्लिमांच्या धार्मिक कार्यक्रमांसाठी हिंदूंनी जागा आणि इतर योगदान दिल्याची उदाहरणेही आहेत. तर मुस्लिमांनीही हिंदूंना धार्मिक कार्यक्रमांसाठी मदत केल्याचे उदाहरणेही पुढे येत आहेत. मात्र, काही मंडळी राजकीय हेतूने या दोन समाजातील धार्मिक स्थळावरून विनाकारण वाद निर्माण करतात, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

मंडप खर्चाचे यजमानपद मुस्लीम बांधवांना द्या, अशी विनंती आम्ही साप्ताह कमिटीला केली होती. कमिटीने सामाजिक एकोपा आणि सलोख्यासाठी दोन पावले पुढे येऊन आम्हाला मंडप खर्चाची जवाबदारी दिली आहे.
– शौकत शेख (नुरानी मस्जिद व कब्रस्तान ट्रस्ट)

हरिनाम सप्ताह कालावधीत मंडप खर्चाची जबाबदारी मुस्लीम बांधवांनी घेणे ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे. प्रत्येक गावात असे आयोजन केल्यास हिंदू-मुस्लिम धर्मात निर्माण होणारी दरी कमी होईल.
– संतोष शेळके (उपसरपंच)
