बहिणीच्या प्रियकराची हत्या करणार्या भावाला केले जेरबंद सैराट चित्रपटाच्या कथानकाला उजळणी; श्रीरामपूर तालुका पोलिसांची कारवाई
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील भोकर येथून प्रेम प्रकरणातून पळून गेलेल्या बहिणीच्या प्रियकराची भावाने हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणामुळे सैराट चित्रपटाच्या कथानकाला उजळणी मिळाली. औरंगाबाद जिल्ह्यातील इसारवाडी फाटा परिसरात बहिणीच्या प्रियकराचा खून करुन पळून जात असलेल्या आरोपीस अवघ्या चार तासांत भोकर ते खोकर फाटा दरम्यान श्रीरामपूर तालुका पोलिसांनी जेरबंद करून वाळुंज पोलिसांच्या ताब्यात दिलेे.
भोकर येथून काही वर्षापूर्वी गावातच राहणारा बाबासाहेब छबुराव खिलारी याने गावातीलच एका मुलीस फूस लावून पळवून नेल्याची चर्चा काही दिवस चालली. त्यानंतर त्यावर विरजन पडले. परंतु गुरुवारी (ता. 29) दुपारी गावातील तरुणीला पळवून नेणार्या बाबासाहेब खिलारी यांची औरंगाबाद जिल्ह्यातील विसारवाडी फाटा परिसरात हत्या झाल्याची वार्ता गावात पोहचली. ही हत्या त्याने पळवून नेलेल्या तरुणीच्या भावाने केली असून तो श्रीरामपूरकडे आला व तालुका पोलिसांत हजर झाल्याची चर्चा गावात सुरू होती.
अखेर रात्री उशिराने श्रीरामपूर तालुका पोलिसांनी औरंगाबाद येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस अवघ्या चार तासांत जेरबंद केल्याची माहिती एका प्रेसनोटद्वारे दिली.
सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात यांना औरंगाबाद शहर हद्दीतील वाळुंज पोलीस ठाण्यात गुरनं.401/2022, भादंवि कलम 302 मधील आरोपी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पळाल्याची माहिती कळविण्यात आली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक खोकरकडे रवाना केले. या पथकाने भोकर शिवारातील खोकर फाटा परिसरात आरोपी त्याच्याजवळील मोटारसायकलवरुन (क्र.एमएच.15, एएन.6285) येत असताना दिसला. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने मोटारसायकल रस्त्यावर टाकून शेजारील उसाच्या शेतात पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने जेरबंद केले. सदर कारवाई सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, उपनिरीक्षक संजय निकम, अतुल बोरसे, सहायक फौजदार हबीब अली, पोलीस नाईक अनिल शेंगाळे, प्रशांत रणनवरे, पोकॉ. संदीप पवार यांनी ही केली. आरोपीस वाळुंज पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन इंगोळे हे करीत आहेत. दरम्यान या घटनेमुळे सैराट चित्रपटाच्या कथानकाला उजाळा मिळाल्याची चर्चा सुरू आहे.