मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा! अकोलेतील ओबीसी व बारा बलुतेदार समाजाची निवेदनातून मागणी

नायक वृत्तसेवा, अकोले
ओबीसी समाजाला संघर्षाचा इतिहास नाही. त्यामुळे या समाजावर माझा फार विश्वास नाही असे ओबीसी समाजाबाबत वक्तव्य करणारे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी अकोले तालुक्यातील ओबीसी समाज व बारा बलुतेदार समाजाने केली आहे.

गुरुवारी (ता.13) अकोले तालुक्यातील ओबीसी समाज व बारा बलुतेदार समाजाच्यावतीने संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार गणेश माळवे यांना निवेदन दिले. या निवेदनाच्या प्रती राज्यपाल व तहसीलदार यांना देखील देण्यात आल्या. सदर निवेदनावर मच्छिंद्र मंडलिक, प्रमोद मंडलिक, बाळासाहेब वाकचौरे, रामदास पांडे, शारदा शिंगाडे, अनिल कोळपकर, देवीदास तिकांडे, नवनाथ पन्हाळे, संदीप गायकवाड, चंद्रकांत खर्डे, सखाहरी पांडे, दत्तात्रय मंडलिक, संतोष खांबेकर, इंद्रभान कोल्हाळ, समीर दोडे, दत्ता बंदावणे, नवनाथ पांडे, एन.टी.कदम आदिंच्या सह्या आहेत.

मंत्री आव्हाड यांनी जातीवाचक भाष्य करून कष्टकर्यांचा अपमान केला आहे. याचबरोबर इतर समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे म्हणून मुख्यमंत्र्यांनी आव्हाड यांचा राजीनामा घ्यावा. तसेच ओबीसी व बारा बलुतेदार समाजाची माफी मागावी अशी मागणी केली आहे. अन्यथा ओबीसी व बारा बलुतेदार समाज आपल्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून अन्य मार्गाने आंदोलन करेल असा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.
