‘पद्मश्री’ पुरस्कार हा माझा नसून काळ्या आईचा आहे ः बीजमाता पोपेरे राजूर येथे विविध संस्थांच्यावतीने तालुक्यातील पुरस्कार्थींचा सन्मान

नायक वृत्तसेवा, अकोले
माझा पुरस्कार हा माझा नसून माझ्या काळ्या आईचा आहे. तिच्यामुळेच मी आज पद्मश्रीपर्यंत पोहचले असे सांगतानाच प्रत्येक गावात बीज बँक होऊन विषमुक्त शेती निर्माण व्हावी, शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबाव्यात. राजूर (ता.अकोले) येथे माझा झालेला सत्कार माझ्या दृष्टीने मायेचा आहे. तो मी विसरू शकणार नाही असे भावोद्गार पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी काढले.

आदिवासी उन्नती सेवा संस्था, आदिवासी विकास परिषद, पेसा सरपंच परिषद यांच्यावतीने बीर बीरसा मुंडा, क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या स्मूर्ती कार्यक्रमाचे औचित्य साधून पद्मश्री पुरस्कारप्राप्त राहीबाई पोपेरे, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ममताबाई भांगरे, राज्यपाल पुरस्कार प्राप्त महेश धिंदळे, कृषीभूषण पुरस्कार प्राप्त गंगाराम धिंदळे व पशुवैद्यकीय परीक्षेत भारतात प्रथम आलेला सुनील जाधव यांना माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. जीपमधून पुरस्कारप्राप्त मान्यवरांचा पारंपारिक वाद्य निनादात, आदिवासी उन्नती संस्थेच्या विद्यार्थी पालक संस्थेच्या मंडळाने भव्य मिरवणूक काढली. कोंबड नृत्य व पारंपरिक आदिवासी नृत्याची व गाण्यांची बरसात करत राजूर बाजारपेठेत मुख्य सत्कार कार्यक्रमास सुरुवात झाली.

वीर बीरसा मुंडा, क्रांतिवीर राघोजी भांगरे, डॉ.गोविंद गारे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. याप्रसंगी बोलताना माजी मंत्री मधुकर पिचड म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबरला देशात जनजाती गौरव दिन म्हणून जाहीर करून खर्‍या अर्थाने आदिवासी क्रांतिकारकांचा सन्मान वाढविला. तालुक्याच्या बीजमाता राहीबाई पोपेरे, यांना पद्मश्री पुरस्कार, ममताबाई भांगरे यांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन आदिवासी महिलांना सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मान केला. तर आदिवासी भागात रस्ते, पाणी योजना, वीज, आरोग्य, शिक्षण, संपर्कासाठी नेट, यासाठी भरीव तरतूद केली आहे. तर नुकताच शेतीचे तीन कायदे मागे घेऊन दिलासा दिला आहे. मात्र असे असूनही त्यांच्याविरोधात टीका करतात फळ आलेल्या झाडाला दगड मारले जातात. लवकरच आपण पंतप्रधान यांना भेटून आदिवासींसाठी स्वतंत्र विद्यापीठ करावे, देशात आदिवासींसाठी सावतंत्र बजेट, करावे अशी मागणी करणार आहे.

तर सोपानराव तथा एस. झेड. देशमुख यांनी आदिवासी समाज देव धर्म देश रक्षक असून शिवाजी महाराजांच्या काळात महत्वाची भूमिका बजवणारे व ब्रिटीश राजवटीच्या काळात इंग्रजांना सळो की पळो करणारे क्रांतिवीर आदिवासी होते. आदिवासींना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी मंत्री पदावर लाथ मारणारे मधुकर पिचड आदिवासींचे आंबेडकर आहेत. तर राहीबाई पोपेरे आदिवासी विद्यापीठ आहे. बीरसा मुंडा नावावर संघटना काढून आदिवासींमध्ये फूट पडून क्रांतिवीर प्रतिमा मलीन करण्याचे काम काही लोक करत असल्याचे ते म्हणाले. यावेळी मंगलदास भवारी, दत्ता देशमुख, गणपत देशमुख, विजय भांगरे, सुरेश भांगरे, कमल बांबले, गोकुळ कानकाटे, अनंत घाणे, भरत घाणे, उपस्थित होते. प्रास्ताविक सी.बी.भांगरे यांनी केले तर आभार भास्कर एलमामे यांनी मानले.

Visits: 113 Today: 2 Total: 1415788

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *