राजूर ग्रामपंचायतचा वसुलीसाठी अनोखा फंडा..

नायक वृत्तसेवा, राजूर
अकोले तालुक्यातील राजूर ग्रामपंचायतने पाणीपट्टी व घरपट्टी वसुलीसाठी विशेष वसुली पथक स्थापन केले आहे. हे पथक थकबाकीदाराच्या घरी जाऊन ध्वनिक्षेपकावर थकबाकीदाराचे नाव व थकबाकी ताशा वाजवून पुकारत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतचा हा अनोखा फंडा चर्चेचा विषय झाला असून, शंभर टक्के थकबाकीची वसुली होते की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

गेल्या दहा दिवसांपासून राजूर ग्रामपंचायतच्या पाणी योजनेचा वीज पुरवठा महावितरण कंपनीकडून खंडीत करण्यात आला आहे. ग्रामपंचयात कार्यालयाची मोठी थकबाकी राहिल्यामुळे हा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. यामुळे गावच्या पाणीप्रश्नाचे कायमचे रडगाणे पुन्हा सुरू झाले आहे. त्यात अनधिकृत नळजोडणी कळीचा विषय आहे. सध्या कोरोना संकट चालू असल्याने आर्थिक समस्येमुळे वसुली होत नसल्याचे ग्रामपंचायतचे म्हणणे आहे. परंतु, यापूर्वीच वसुली करुन वीजबिल भरणे शक्य असतानाही ग्रामपंचायतीने ते केले नाही. याचा परिणाम आज ऐन उन्हाळ्यात भोगावा लागण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सध्या ग्रामपंचायत थकबाकीदारांकडून वाजतगाजत वसुली करत असलेला अनोखा फंडा कितपत यशस्वी होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Visits: 47 Today: 1 Total: 437309

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *