… अखेर ‘त्या’ मृत कावळ्याचा अहवाल ‘निगेटिव्ह’
नायक वृत्तसेवा, घारगाव
मंगळवारी (ता.19) घारगाव येथे मृतावस्थेत सापडलेला कावळा बर्ड फ्ल्यूच्या तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविला होता. त्याचा अहवाल नुकताच प्रशासनाला प्राप्त झाला असून नकारात्मक (निगेटिव्ह) आला आहे. यामुळे स्थानिक प्रशासनासह नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील घारगाव येथे गेल्या सहा-सात दिवसांत अनेक कावळे मृतावस्थेत आढळून आले होते. याची प्रशासनाने गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी घारगाव व दहा किलोमीटरचा परिसर सतर्क क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. त्यातच दिलासादायक वृत्त मिळाले असून, पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविलेला कावळ्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामुळे कुक्कुटपालन व्यवसायात लाखो रुपये गुंतवणूक करणार्या तरुण उद्योजक, पशु संवर्धन व वन विभागाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. तरी नागरिकांनी भीती न बाळगता खबरदारी घेणे गरजेचे आहे.