जनतेचा विश्वास जपण्याचे काम करा : ना.विखे पाटील

नायक वृत्तसेवा,लोणी
शासकीय सेवेत दाखल होणाऱ्या तरुणांसाठी ही संधी केवळ नोकरी नसून जनतेच्या सेवेसाठीची मोठी जबाबदारी आहे. या तरुणांनी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे, त्यांना दिलासा देण्याचे व प्रशासनावरील जनतेचा विश्वास दृढ करण्याचे काम करावे असे आवाहन जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. शासनाच्या कामकाजात ‘झिरो पेंडन्सी’ हा उपक्रम राबवून प्रत्येक विभागाचे काम अधिक लोकाभिमुख करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.
लोणी येथे झालेल्या जिल्हास्तरीय नियुक्ती आदेश वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. या सोहळ्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शिफारस झालेले व अनुकंपा तत्त्वावर नियुक्त झालेल्या ३३८ उमेदवारांना नियुक्ती आदेश वाटप करण्यात आले. यावेळी आ. काशिनाथ दाते, आ. अमोल खताळ, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. विखे पाटील म्हणाले, राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एका दिवसात तब्बल १० हजार तरुणांना शासकीय सेवेत दाखल करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. ही केवळ नियुक्ती नसून राज्याच्या विकासासाठी योगदान देण्याची संधी आहे.  पूर्वी अनुकंपा नियुक्ती प्रक्रिया क्लिष्ट व वेळखाऊ होती, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ती जलद, सुलभ व पारदर्शक करण्यात आली आहे. आता जिल्हाधिकारी स्तरावरच अनुकंपा नियुक्ती अधिकार दिल्याने जलद व  पारदर्शक नियुक्ती प्रक्रिया पार पडणार आहे असे ते म्हणाले.
यावेळी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेल्या राज्यस्तरीय अनुकंपा आणि लिपिक नियुक्ती आदेश वितरण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांसाठी एमपीएससीमार्फत १६० आणि अनुकंपा तत्त्वावर १७८ उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले.
Visits: 386 Today: 1 Total: 2058790

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *