पत्रकारांनी नेहमी सकारात्मक विचार करावा : मालपाणी
नायक वृत्तसेवा, शिर्डी
भारतामध्ये लोक राजकारण्यांपेक्षा पत्रकारितेवर अधिक विश्वास ठेवतात. हा विश्वास टिकवणं आणि त्याला योग्य दिशा देणं ही पत्रकाराची जबाबदारी आहे. त्यामुळे सर्व पत्रकारांनी कायमच सकारात्मक विचार करावा असा सल्ला मालपाणी उद्योग समूहाचे संचालक गिरीश मालपाणी यांनी पत्रकारांना दिला.

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील व्हाईस ऑफ मीडियाच्या’ कार्य शाळेत पत्रकारांना मार्गदर्शन करतांना मालपाणी म्हणाले की, आजकाल अनेक लोक सतत राजकीय घडामोडींमध्ये गुंतलेले असतात. कोण कुठल्या पक्षात आहे, कोण कुठे गेला, कोण काय बोलला, या सगळ्यांचा इतका विचार केला जातो की, मूळ वैचारिक स्पष्टता हरवत चालली. पत्रकार नुसता बातमी सांगणारा नव्हे तर तर तो एक समाजाचा आरसाही आहे. समाजात काय घडतंय,याच्या फक्त बातम्या नाही तर त्यामागचं सत्य, प्रश्न, शक्यता आणि उपाय सांगणं ही खरी पत्रकारिता आहे.आजच्या काळात केवळ राजकारणावर लक्ष केंद्रित न करता विज्ञान, अध्यात्म, स्टार्टअप्स, कृषी, विविध व्यवसाय या विषयांनाही माध्यमांमध्ये स्थान मिळायला हवं.कारण समाज फक्त राजकारणाने बनलेला नाही, तर या विविध क्षेत्रांतील घडामोडींनी तो घडतो.सगळ्यांनी यूट्यूबवर आपलं चॅनेल सुरू करून स्वतःचे विचार, अनुभव, माहिती, स्थानिक बातम्या मोकळेपणाने मांडाव्यात. सुरुवातीला कमी लोक पाहतील, पण सातत्य ठेवल्यास यश नक्कीच मिळेल.चढ-उतार हे जीवनाचं सत्य आहे, पण सकारात्मक विचारांनी ते सहज झेलता येते.

पत्रकारितेला एक ‘मिशन’ म्हणून पाहा, केवळ करिअर किंवा व्यवसाय म्हणून नव्हे. नवीन गोष्टी शिका, स्वतःला अपडेट ठेवा.दररोज झोपताना स्वतःला विचारा, मी आज काही चांगलं केलं का? फळाची चिंता न करता काम करत राहा. यश नक्की मिळेल असा आशावाद गिरीश मालपाणी यांनी यावेळी व्यक्त केला.

Visits: 133 Today: 1 Total: 1588210
