वाहनाचा ‘हॉर्न’ वाजवल्याच्या कारणावरुन जोर्वेनाक्यावर दंगल! जोर्वे गावातील तणाव वाढला; दोन टपर्या फोडून सामानाची जाळपोळ..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही दिवसांपासून घडणार्या वेगवेगळ्या घटनांची खद्खद् रविवारी रात्री दंगलीच्या रुपाने उफाळून आली. रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जोर्वेनाका परिसरात वाहतूक कोंडी झाल्याने त्यातून बाहेर पडण्यासाठी जोर्वेतील एका वाहचालकाने ‘हॉर्न’ वाजवला. त्यावरुन 25 ते 30 जणांनी ‘त्या’ वाहनचालकासह त्याच्यासोबत असलेल्या अन्य तिघांनाही बेदम मारहाण केली. सदर घटनेबाबत जोर्वेतील अन्य चौघांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याचाही राग मनात धरुन रात्री साडेनऊच्या सुमारास जोर्वेकडे निघालेल्या ‘त्या’ चौघांनाही पुन्हा त्याच ठिकाणी दीडशेहून अधिकजणांच्या जमावाने तलवारी, चॉपर, रॉड व लाकडी दांडक्यांचा मुक्त वापर करीत अमानुष मारहाण केली. या घटनेत दोन टप्प्यात आठजण जखमी झाले आहेत. या प्रकरणी जखमी रविंद्र नामदेव गाडेकर यांच्या फिर्यादीवरुन दीडशे जणांवर जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नासह भारतीय शस्त्र कायदानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. या घटनेनंतर जोर्वे गावात तणाव वाढला असून आज सकाळी तेथील चिकन विक्रेते दुचाकी दुरुस्तीची दुकाने फोडून त्यातील सामानाची जाळपोळ करण्यात आली आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरच्या घटनेची सुरुवात रविवारी (ता.28) सायंकाळी साडेसहा वाजता झाली. जोर्वेनाक्यापासून जोर्वे गावाकडे जाणार्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणं बोकाळल्याने या भागात वारंवार वाहनांचा खोळंबा होत असतो. रविवारी सायंकाळीही असाच प्रकार घडला. बराचवेळ वाहने पुढेच सरकत नसल्याने संगमनेरात पशुखाद्य खाली करुन जोर्वेकडे जाणार्या पिकअप वाहनाच्या चालकाने ‘हॉर्न’ वाजविला. त्यावरुन तेथिल बाबु टपरीवाला, इम्रान वडेवाला, नदीम हुसेन शेख, इम्रान (युसुफ पेंटरचा मुलगा), रियाज जहीर शेख (रिक्षावाला), राहीफ व साफीक चहावाला यांच्यासह 20 ते 25 जणांची त्या वाहचालकासोबत हमरीतुमरी झाली.

हा प्रकार सुरु असतांना तेथे मोठा जमाव जमल्याने शाब्दीक संघर्षाला हिंसक वळण लागले आणि जमलेल्या जमावाने वाहनातील सुमीत पोपट थोरात, तन्मय नानासाहेब दिघे, विजय मंजाबापू थोरात व कुंडलिक दिघे या चौघा तरुणांना बेदत मारहाण केली. त्यानंतर हे चौघेही जोर्वे गावात गेल्यानंतर त्यांनी घडला प्रकार गावातील मंडळींना सांगितला. त्यामुळे जोर्वेतही तणाव निर्माण झाला. यावेळी माजी उपसरपंच गोकूळ गणपत दिघे, रविंद्र नामदेव गाडेकर, बाबासाहेब शिवाजी थोरात, जितेंद्र कैलास शिंदे, अजय भिमाजी थोरात व गणेश बंडोपंत काकड यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात येवून या घटनेची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करीत जखमींना रुग्णालयात पाठवले.

‘त्या’ चौघाही तरुणांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर वरील सहाजण रात्री नऊच्या सुमारास आपल्या तीन दुचाकींवरुन जोर्वे गावाकडे निघाले असता जोर्वेनाक्यावरील वळणाच्या रस्त्यावर शंभर ते दीडशे जणांचा सशस्त्र जमाव हातात तलवारी, चॉपर, लोखंडी फायटर, लोखंडी रॉड व लाकडी दांडके घेवून त्यांच्यावर चालून आला. यावेळी जमावातील काहीजण ‘ये वहीं लोग है जो अपने खिलाफ पोलीस स्टेशन में तक्रार करने गये थे. आज इनकों जिंदा घर नहीं जाने देंगे!’ असे म्हणत जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी जमावातील इरफान व इम्रान वडेवाला आणि त्यांच्याडे काम करणारे तिघेजण, बाबु टपरीवाला, अकील टपरीवाला, नदीम हुसेन, ताहीर नजीर पठाण, शाहीद वाळुवाला, मुसेफ शेख, मुज्जू, फय्युम फिटर, राहीफ व साफीक चहावाला व एफ्फूखान वडेवाला यांच्यासह काहीजणांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

या मारहाणीत इरफान वडेवाला याने रविंद्र गाडेकर यांना लोखंडी रॉडने मारहाण केली तर आराफत रफिक शेख याने हातात असलेल्या धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केले. यावेळी इरफान वड्यावाल्याच्या तिघा कामगारांनी तलवार, लोखंडी फायटर व रॉडने बाबासाहेब शिवाजी थोरात याच्या डोक्यावर, हातावर व पायावर वार केले तर इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत त्याला गंभीर जखमी केले. मुज्जू व फय्युम फिटरने लोखंडी फायटर व लाकडी दांडक्याने अजय भिमाजी थोरात याच्यावर हल्ला करुन त्याला जखमी केले. अकील टपरीवाला, नदीम हुसेन, ताहीर नजीर पठाण व शाहीद वाळुवाला या चौघांनी जितेंद्र कैलास दिघे याला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली.

याबाबत आज पहाटे जखमी असलेल्या रविंद्र नामदेव गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी वरील निष्पन्न आरोपींसह 100 ते 150 जणांवर जीवे ठार माण्याचा प्रयत्न, प्राणघातक शस्त्राने हल्ला, भारतीय शस्त्र कायदा व दंगलीच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे. या मारहाणीत जोर्वेतील आठजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर जोर्वे येथील अनेकजण व शहरातील हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते शहर पोलीस ठाण्याच्या आवारात जमले होते. त्यामुळे मध्यरात्रीच्या वेळी शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. या घटनेची जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी गांभीर्याने दखल घेतली असून शहरात अतिरीक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

या घटनेने जोर्वेनाका व जोर्वे गावात तणाव निर्माण झाला आहे. मारहाणीच्या घटनेनंतर रविवारी रात्री पालिकेच्या अतिक्रमण विभागाने जोर्वेनाक्यावरील अतिक्रमण हटविण्याचाही प्रयत्न केला. मात्र यावेळी मोठ्या संख्येने जमाव गोळा झाल्याने किरकोळ कारवाई वगळता अतिक्रमण विभागाला तेथून काढता पाय घ्यावा लागला. या सर्व घटनांचे पडसाद आज सकाळी जोर्वे गावात उमटले आहेत. रात्रीच्या घटनेने संतप्त झालेल्या जोर्वेतील तरुणांनी आज (ता.29) सकाळी गावातील चिकन विक्रेते व दुचाकी दुररुस्ती करणार्यांच्या टपर्यांमधील सामान बाहेर काढून ते पेटवून देण्यात आले. जोर्वे ते संगमनेर या तीन किलोमीटरच्या अंतरावर दिवसभर चालणार्या शटल रिक्षाही आज सकाळपासून बंद ठेवण्यात आल्या आहेत. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, तालुका पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्यासह जोर्वे गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडलेल्या घटनेची शहर पोलिसांनी गांभीर्याने नोंद घेवून तत्काळ कारवाई केली असती तर कदाचित नंतरचा प्रकार घडलाच नसता. मात्र पोलिसांनी केवळ कागदावर ‘रामराज्य’ भासवण्यासाठी बेदम मारहाण होवूनही अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने त्याची परिणीती रात्री शंभर ते दीडशे जणांचा सशस्त्र जमाव गोळा होण्यात व त्यांच्याकडून चौघांवर प्राणघातक हल्ला करण्यात झाली. किरकोळ करणातून घडलेल्या या घटनेने संगमनेर तालुक्यातील दोन समाजांमध्ये वितुष्ट निर्माण झाले आहे.

माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे मूळगाव असलेल्या जोर्वेला जातीय तणावाचा संघर्ष नवा नाही, यापूर्वीही जोर्वेनाका विरुद्ध जोर्वे असा वाद झाल्याचे दाखले आहेत. यावेळी मात्र विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समर्थक गटातील काहींना मारहाण झाली आहे. त्यामुळे या घटनेनंतर रात्री साडेनऊ वाजता पालिका प्रशासनाला जेसीबी घेवून जोर्वेनाक्यावरील अतिक्रमणं हटविण्याची कसरत करावी लागली.

रविवारी रात्री घडलेल्या या घटनेचे तीव्र पडसाद आज (ता.29) सकाळी जोर्वे गावात उमटले. संतप्त तरुणांनी गावातील दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज व चिकन विक्रीचे दुकान फोडून त्यातील संपूर्ण सामान रस्त्यावर आणून पेटवून दिले. यावेळी गॅरेमध्ये असलेली एक दुचाकीही पेटवून देण्यात आली. या घटनेनंतर गावातील पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.

याप्रकरणी पोलिसांकडून दंगेखोरांचा शोध सुरु असून कायदा हातात घेणार्या कोणाचीही गय केली जाणार नाही. सध्या जोर्वेनाका व जोर्वे गावात मुबलक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सर्वत्र शांतता आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे.
भगवान मथुरे
पोलीस निरीक्षक – संगमनेर शहर

