वांबोरीत सापळा लावून 45 गोवंश जनावरांची कत्तलीपासून सुटका राहुरी पोलिसांच्या पथकाची कारवाई; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त


नायक वृत्तसेवा, राहुरी
संगमनेर येथून वांबोरी मार्गे अहमदनगर येथे चाललेल्या एका टेम्पोमध्ये कत्तलीसाठी चालवलेली 45 जनावरे राहुरी पोलिसांच्या पथकाने रात्रीच्या वेळी वांबोरी येथे सापळा लावून पकडली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, राहुरी पोलिसांना गुप्त खबर्‍यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार हवालदार दिनकर चव्हाण, पोलीस नाईक नदीम शेख, सचिन ताजणे, गणेश लिपणे, चालक साखरे या पोलीस पथकाने वांबोरी परिसरातील केएसबी चौकात रात्री दहा वाजेच्या सुमारास सापळा लावला. त्यावेळी तेथे एक आयशर टेम्पो (एमएच.17, बीवाय. 2478) आला. पथकाने त्या टेम्पोला थांबवून तपासले असता त्यामध्ये गोवंश जनावरे आढळून आली. टेम्पो चालकाकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की, सदर जनावरे संगमनेर येथील ग्रामीण भागातील शेतकर्‍यांकडून विकत घेऊन अहमदनगर येथे कत्तलीसाठी चालवली आहे.

पोलिसांनी 50 हजार रुपये किंमतीच्या 5 जर्शी गाई, 40 हजार रुपये किंमतीची 40 वासरे तसेच 5 लाख रुपये किंमतीचा आयशर टेम्पो असा एकूण 5 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस नाईक गणेश लिपणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी महंमद रफीक उस्मान कुरेशी (वय 32, रा. मदिनानगर, ता. संगमनेर) याच्या विरोधात गुरनं. 130/2023 प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 नुसार 11 (1) (एफ), महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 नुसार 5 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Visits: 135 Today: 1 Total: 1800739

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *