श्रीरामपूरात कोरोना नियम पायदळी; रस्त्यांवर होतेय गर्दी
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
राज्य शासनाने कोरोनाचे नियम शिथिल करून दुकाने उघडण्यास परवानगी दिली असताना श्रीरामपूर शहरात नियमांना हरताळ फासला जात असल्याचे वास्तव चित्र दिसत आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांसह दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कोरोनाचा विस्फोट होण्याची शक्यता जाणकार व्यक्त होत आहे. याकडे प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष देण्याची गरज आहे.
राज्य शासनाने नियम व अटी शिथिल करत शासनाने सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रारंभीच्या काही दिवस गर्दी आटोक्यात होती. आता मात्र सगळीकडे गर्दीच गर्दी दिसत आहे. मंगळवारी (ता.13) तर गर्दीने उच्चांक केला. गर्दीमुळे शिवाजी रोड व मेनरोडवर वाहतुकीची कोंडी झाली होती. याचबरोबर शहरातील अनेक भागातील भाजी विक्रेत्यांवर कोणाचा धाक राहिलेला नसल्याचे दिसते. सायंकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत विक्रेते दुकाने थाटून बसलेली असतात. सकाळच्या वेळी त्यांच्याकडेही मोठी गर्दी होते. पहाटे मार्केट यार्डवरही तीच परिस्थिती पहायला मिळतेे. अनेक दुकानांमध्ये सॅनिटायझर ठेवलेले नाही, दुकानातील कामगारांना मास्क नाही, सुरक्षित अंतर ठेवले जात नाही. गर्दीतही कोणीही नियमांचे पालन करताना दिसत नाही. यामुळे पुन्हा कोरोनाचा विस्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष देण्याची गरज आहे.