पंडीत दीनदयाळ व बिंदू जोशींचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावे ः भांगरे

पंडीत दीनदयाळ व बिंदू जोशींचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावे ः भांगरे
महाराष्ट्र ग्राहक पंचायत अकोले शाखेच्यावतीने जयंती साजरी
नायक वृत्तसेवा, अकोले
देशात तीर्थरूप बिंदू माधव जोशी यांनी ग्राहकांच्या हितरक्षणासाठी अनेक वर्षे लढा दिला. नेहमी ग्राहकांच्या हिताची जोपासना केली. जोशींवर लोकमान्य टिळक व पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांचा विशेष प्रभाव होता. पंडीत हे अत्यंत गरीब कुटुंबात जन्माला आलेले होते. तरी त्यांनी आजन्म ब्रम्हचारी राहून देशसेवा व जनसेवा केली. म्हणूनच त्यांना एकात्मता व मानवता वादाचे जनक संबोधले जाते. आता त्यांचे विचार तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवावे असे आवाहन भाजपाचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी केले.


ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा अकोलेच्यावतीने आयोजित जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी रमेश राक्षे, अ‍ॅड.वसंत मनकर, ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, धनंजय संत, रामहरी तिकांडे, राम रूद्रे, अ‍ॅड.भाऊसाहेब वाळुंज, भाजपचे सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, नगरसेवक प्रमोद मंडलिक, सुदाम मंडलिक, दत्ता रत्नपारखी, खादी ग्रामोद्योग मंडळाचे संचालक भाऊसाहेब वाकचौरे, संजय मालुंजकर आदी उपस्थित होते.


पुढे बोलताना भांगरे म्हणाले, बिंदू माधव जोशी हे ग्राहक प्रबोधनकर्ते, ग्राहक हित रक्षणकर्ते, कुशल संघटक, स्वातंत्र्य सेनानी, स्वदेशीचे पुरस्कर्ते, राष्ट्रीय ‘स्वाहा ईदम न मम वृत्तीने’ जीवन जगून ग्राहकाला न्याय मिळवून दिशा देणारे होते. यावेळी अ‍ॅड.मनकर, राक्षे, अ‍ॅड.दीपक शेटे, वाकचौरे, नितीन जोशी यांनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन दत्ता रत्नपारखी यांनी केले तर आभार वाकचौरे यांनी मानले.


नाभिक समाजाच्यावतीने कारागिरांना मास्क व हातमोजाचे वाटप
बिंदू माधव जोशी यांच्या जयंती सप्ताहानिमित्त अकोले येथे नाभिक समाजाचे कार्यकर्ते किरण चौधरी यांनी तालुक्यातील सर्व नाभिक कारागिरांना 200 हातमोजे, 100 मास्क व ऑरगॅनिक गोळ्यांचे 100 पॅकेटचे वितरण केले. या उपक्रमाबद्दल चौधरी यांचे सर्वच स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Visits: 108 Today: 1 Total: 1583374

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *