‘उभारी’ अभियानाचा देवकौठे येथून प्रारंभ

‘उभारी’ अभियानाचा देवकौठे येथून प्रारंभ
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना जास्तीत जास्त शासकीय सुविधा देणार ः निकम
नायक वृत्तसेवा, संगमनेर
नाशिक विभागातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना जास्तीत जास्त शासनाच्या सुविधा मिळाव्यात. यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘उभारी’ अभियानाचा शुभारंभ संगमनेर तालुक्यातील देवकौठे येथून तहसीलदार अमोल निकम यांच्या उपस्थितीत नुकताच करण्यात आला.


देवकौठे येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी सोमनाथ कहांडळ कुटुंबियांची भेट घेऊन या अभियानाचा प्रारंभ संगमनेर तालुक्यात झाला. यावेळी तहसीलदार अमोल निकम, बाजार समितीचे संचालक भारत मुंगसे, एकनाथ मुंगसे, सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र कहांडळ, दूध संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मुंगसे, नामदेव कहांडळ, दशरथ कहांडळ, अनिल गाजरे, पोलीस पाटील शत्रुघ्न मुंगसे, तलाठी अमोल गडाख, ग्रामसेवक गायकवाड, कृषी सहाय्यक स्मिता सहाणे, रोहिदास मुंगसे यांसह नागरिक उपस्थित होते.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषीमंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे सूचनेनुसार ‘उभारी’ अभियानांतर्गत नाशिक विभागात 2 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर, 2020 या काळात आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबियांची सध्याची अवस्था, आत्तापर्यंत मिळालेल्या योजनांचा लाभ, स्वयंरोजगार देण्यासाठी प्रयत्न यासाठी हा शासकीय कार्यक्रम सर्व तालुक्यांमध्ये राबविण्यात येत आहे. याची माहिती प्रत्यक्ष कुटुंबियांची भेट घेवून घेतली जाणार आहे. तर यासाठी स्थानिक अधिकार्‍याची नेमणूक करुन त्या कुटुंबियांच्या मदतीसाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. यासाठी तहसीलदार निकम यांनी अशा शेतकर्‍यांच्या गावातील शासकीय सर्व अधिकार्‍यांना याबाबत मदतीच्या सूचना दिल्या असून वडगाव लांडगासह काही गावांना भेटी दिल्या.

 

Visits: 182 Today: 1 Total: 1600721

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *