राजमार्ग प्राधिकरण ठेकेदार कंपनीला पाठीशी घालीत असल्याचे सुस्पष्ट! तीस किलोमीटरच्या अंतरात चोवीस हजार झाडांपैकी सापडली अवघी वीस झाडे..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
कत्तल केलेल्या झाडांच्या बदल्यात ‘पुणे-नाशिक’ महामार्ग निर्मिती करणार्‍या कंपनीने लावलेली सुमारे चोवीस हजार झाडे मंगळवारपासून ‘शोधण्यास’ सुरुवात झाली. प्रत्येकी पंधरा किलोमीटरच्या टप्प्यासाठी नियुक्त केलेल्या संयुक्त पथकाने मंगळवारीच अर्धी भूमिका पूर्ण केली असून उर्वरीत पथकांकडून आकडेमोड केली जात आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकार्‍यांसह प्रांताधिकांसोबतच्या बैठकीत राजमार्गाच्या प्रकल्प संचालकांनी ठेकेदाराने झाडे लावली, पण त्यातील बरीच वाढली नाही किंवा नष्ट झाल्याचे सांगून एकप्रकारे त्यांना पाठीशी घालण्याचाच प्रयत्न केला होता हे आता उघड होत आहे. मंगळवारी संयुक्त पथकाकडून राबविण्यात आलेल्या ‘झाड शोध’ मोहीमेत तब्बल 30 किलोमीटरच्या अंतरात अवघी 20 झाडे सापडली आहेत. याचा अर्थ महामार्ग निर्मात्या कंपनीने एकतर सरासरी प्रत्येक दिड किलोमीटरवर एकच झाड लावले किंवा संयुक्त पथकाने शेतकर्‍यांच्या बांधावर लावलेल्या झाडांचीही गणती केली असा होवू शकतो. संबंधित कंपनीने महामार्गाच्या राहीलेल्या 30 टक्के कामांसह पन्नास किलोमीटरच्या रस्त्यावरील 24 हजार झाडेही खावून टाकल्याचा धक्कादायक प्रकारही या ‘शोध मोहीमेतून’ समोर येवू लागला आहे.


साडेआठ वर्षांपूर्वी पुणे-नाशिक महामार्गाच्या नूतनीकरण कामाला सुरुवात झाली. या कामात अडथळा ठरणारी तब्बल 2 हजार 373 झाडे कापण्यात आली. कापलेल्या झाडांच्या बदल्यात संबंधितांनी दहा पट म्हणजे 23 हजार 730 झाडे नव्याने लावून त्यांचे संगोपन करावे असे तत्कालीन प्रांताधिकारी डॉ.संदीप निचित यांनी राजमार्ग प्राधिकरणासह ठेकेदार कंपनीला कळविले होते. मात्र यासर्व गोष्टींना मोठा कालावधी उलटूनही महामार्गावर झाडेच दिसत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते गणेश बोर्‍हाडे यांनी 14 सप्टेंबर 2019 रोजी संगमनेरच्या प्रांताधिकार्‍यांकडे याबाबत तक्रार केली. त्यावर गेली दोन वर्ष या विषयावर केवळ कागदी घोडे नाचू लागल्याने बोर्‍हाडे यांनी हरित लवादात धाव घेतली.

या दरम्यान संगमनेरच्या प्रांताधिकार्‍यांनी 25 फेब्रुवारी 2021 रोजी भारतीय राजमार्ग विभागाचे प्रकल्प संचालक, तहसीलदार, वनपरिक्षेत्र अधिकारी (भाग 1) व या प्रकरणाचे तक्रारदार गणेश बोर्‍हाडे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. या बैठकीत 8 जानेवारी 2014 च्या आदेशाप्रमाणे प्रत्यक्षात वृक्षांची लागवड करण्यात आली किंवा कसे याची पडताळणी करण्यासाठी उपविभागीय वनअधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली, भारतीय राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक व संगमनेरचे तहसीलदार सदस्य असलेली संयुक्त समिती स्थापन केली व या समितीकडून याबाबतचा अहवाल मार्च 2021 अखेर मिळेल असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.


याच बैठकीत महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक अनिल गोरडे यांनी राष्ट्रीय महामार्ग क्र. 50 च्या दुतर्फा व मधोमध झाडे लावण्यात आली होती. त्यातील काही झाडांचे जतन झाले नाही, तसेच नव्याने वृक्ष लागवड करण्यासाठी प्राधिकरणाकडून नव्याने ठेकेदाराची नियुक्ति करुन लागवड पूर्ण करण्याबाबत आश्‍वासन दिले होते. विशेष म्हणजे फेब्रुवारीत पार पडलेल्या या बैठकीत नव्याने वृक्ष लागवड करण्याचे काम एप्रिल व मे या दोन महिन्यात पूर्ण करावे, ज्या योगे जूनपासून सुरु होणार्‍या पावसामुळे लागवड झालेली अधिकाधिक झाडे जगू शकतील असेही ठरले होते. प्रत्यक्षात मात्र वृक्षांची नेमकी स्थिती पडताळण्याचे कामच तब्बल तीन महिने विलंबाने मंगळवारी (ता.6) सुरु करण्यात आले. यावरुन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक पर्यावरणाबाबत किती गंभीर आहे हे अगदी स्पष्टपणे दिसून आले.


या बैठकीत ठरल्याप्रमाणे मार्च अखेरपर्यंत कोणतीही कारवाई न झाल्याने तक्रारदार बोर्‍हाडे यांनी पुन्हा प्रांताधिकार्‍यांकडे धाव घेतली. त्यावरुन 10 जून 2021 रोजी पुन्हा वरील सर्व अधिकार्‍यांची बैठक घेण्यात आली व 23 हजार 730 झाडांची मोजदाद करण्याकामी माळवाडी, बोटा, कुरकुंडी, शेळकेवाडी, घारगाव व आंबी खालसा या भागासाठी वनविभागाचे वनपाल आर.के.थेटे, महसुल विभागाचे तलाठी हिरवे व मंडलाधिकारी लोहारे. खंदरमाळवाडी, बांबलेवाडी, डोळासणे, कर्जुले पठार, गुंजाळवाडी पठार, पिंपळगाव देपा, पोखरी बाळेश्‍वर, गाभणवाढी व चंदनापूरी परिसरासाठी चंदनापूरीचे वनपाल रामदास डोंगरे, मंडलाधिकारी लोहारे. हिवरगाव पावसा, वैदुवाडी, रायतेवाडी, खांडगाव, संगमनेर खुर्द, कासारा दुमाला, ढोलेवाडी व गुंजाळवाडी परिसरासाठी कर्‍ह्याचे वनपाल देवीदास जाधव, तलाठी पोमल तोरणे व मंडलाधिकारी बापूसाहेब ससे आणि घुलेवाडी, वेल्हाळे, सायखिंडी, कर्‍हे आणि पळसखेड या परिसरासाठी वनपाल जाधव यांच्यासह तलाठी मिभमराज काकड व मंडलाधिकारी ससे यांची नियुक्ति करण्यात आली होती.


मंगळवारी या संयुक्त पथकाने त्यांना नेमून देण्यात आलेल्या कार्यक्षेत्रात प्रत्यक्ष झाडांचा शोध सुरु केला आणि सायंकाळ होता होता माळवाडी ते हिवरगाव पठारपर्यंतच्या महामार्गावर झाड शोध मोहीम पूर्ण झाली. धक्कादायक गोष्ट म्हणजे पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या माळवाडी पासून सुरु झालेली ही झाड शोध मोहीम जेव्हा 30 किलो मीटर अंतरावरील हिवरगाव पावसा टोलनाक्यापर्यंत पोहोचली, तेव्हा त्यातून केवळ 20 झाडांचे दर्शन संयुक्त पथकाला झाले. यावरुन राजमार्ग प्राधिकरण आणि संबंधित महामार्गाची निर्माता कंपनी असलेल्या ठेकेदाराने 23 हजार 730 झाडे केवळ कागदावरच लावल्याचेही आता अगदी सूर्यप्रकाशाप्रमाणे समोर आले आहे. या अहवालानंतर प्रशासनाची नेमकी काय भूमिका असणार हे पाहणं आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

‘पुणे-नाशिक’ महामार्गाच्या निर्मितीवेळी 2 हजार 373 झाडांची कत्तल होवून सुमारे दहा वर्षांचा कालावधी उलटूनही त्यावर आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. सर्वसामान्य माणसांच्या दारातील एखादे झाडं तोडण्यासाठी कायद्याचा बडगा उगारणार्‍या अधिकार्‍यांनी संबंधित कंपनीकडून इतक्या मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल होवूनही आणि त्या बदल्यात एकही झाड न लावूनही त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. त्यातच महामार्ग प्राधिकरणाच्या संचालकांकडून वारंवार ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा खटाटोप सुरु असल्याने त्यांची एकंदरीत भूमिकाच संशयात आली आहे. आता या झाड शोध मोहीमेनंतर प्रशासन सदर कंपनी विरोधात नेमकी काय भूमिका घेते त्याकडे संगमनेर तालुक्यातील पर्यावरण व वृक्षप्रेमी नागरिकांचे लक्ष्य खिळले आहे.

Visits: 6 Today: 1 Total: 30675

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *