केंद्राने पारित केलेले कृषी कायदे रद्द करा! छात्रभारती, राष्ट्र सेवा दलाची निवेदनातून मागणी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
केंद्र सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली असून, कृषी विधेयकांनाही सहा महिने उलटून गेली आहेत. परंतु, हे कायदे शेतकर्यांना देशोधडीला लावणारी असल्याने ती तत्काळ रद्द करावी, अशी मागणी छात्रभारती व राष्ट्र सेवा दलाने केली आहे. याचा बुधवारी (ता.26) संगमनेर शहर पोलीस ठाण्यासमोर काळे झेंडे हातात घेऊन निषेध करण्यात आला. तसेच पोलिसांना निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात संघटनांनी म्हटले आहे की, केंद्रातील सत्ताधारी भाजपने शेती आणि शेतकर्यांना उध्वस्त करणारे कृषी कायदे मंजूर करून अन्याय केला आहे. या विधेयकांना नुकतेच सहा महिने पूर्ण झाली आहेत. यामुळे पुढील काळात शेतकर्यांची भांडवलदारांकडून मोठ्या प्रमाणात लूट होणार आहे. भांडवलदार, बडे व्यावसायिक यांचा अप्रत्यक्ष मार्ग सरकारने खुला केला आहे. देशभरात कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलने सुरू आहेत. शेकडो शेतकर्यांचे आंदोलनात बळी गेले आहेत. तरी देखील मोदी सरकार बहुमताच्या जोरावर देशामध्ये शेतकरी, कामगार, शिक्षण विरोधी कायदे व धोरणे लादत आहे.
आज कृषी विधेयकांना मंजूर करुन सहा महिने पूर्ण झाले आहेत. याचा निषेध करण्यासाठी आणि कायदे रद्द करण्यासाठी काळे झेंडे दाखवून तीव्र निषेध नोंदवला आहे. तसेच छात्रभारती संघटना व राष्ट्र सेवा दलाच्यावतीने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवून कायदे रद्द करण्याबाबतचे पोलिसांना निवेदन दिले आहे. यावेळी छात्रभारतीचे उपाध्यक्ष अनिकेत घुले, जिल्हा कार्याध्यक्ष तुषार पानसरे, तालुकाध्यक्ष राहुल जर्हाड, गणेश जोंधळे, अश्विन गायकवाड, पप्पू जर्हाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.